प्रतिनिधी/दापोली
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर मुंबईत हाताला काही काम नाही, पोटात अन्न नाही. अशा स्थितीमुळे दापोली तालुक्यातील पावनळ येथील सहा युवकांनी दापोलीला चालत जाण्याचा निर्णय घेतला. त्यांच्याबरोबर मुंबई येथे काम करणाऱ्या त्यांच्याच गावातील एका युवतीने देखील चालत दापोली गाठली.
लॉकडाऊनमुळे मुंबईतील काम गेल्यावर व अन्नाचे सर्व पर्याय संपुष्टात आल्यावर अखेर दापोलीतील पावनळ या गावातील मुंबईला कामानिमित्त असणाऱ्या सहा युवकांनी कोकणात म्हणजे दापोली चालत जाण्याचा निर्णय घेतला. त्यांच्याबरोबर त्यांच्या सोबत त्यांच्या गावातील एक युवती देखील मुंबई येथे कामाला होती तिने देखील त्यांच्याबरोबर चालत येण्याचा निर्णय घेतला. सर्वांनी मोबाईल वरून एकमेकांशी संपर्क साधून ते एका रात्री दिवा स्टेशनवर जमा झाले. कोकणाकडे येणारी एकही गाडी असणार नाही हे त्यांना माहित होते. मग त्यांनी सरळ रेल्वेच्या ट्रॅकमधून खेडच्या दिशेने चालायला सुरुवात केली. जिथे मिळेल तिथे विश्रांती घेत, जिथे मिळेल तिथे पाणी पीत, जिथे मिळेल तिथे ज्या गावात व जे ग्रामस्थ मदत करायला तयार असतील त्यांच्याकडे चहा बिस्किट खात या चौघांनी 4 दिवसांचा प्रवास करून खेड रेल्वे स्टेशन गाठले.
मात्र इथे येण्यापूर्वी त्यांनी त्यांचे गाव ज्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अखत्यारीत येते त्या फणसू तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना फोन करून आपण रेल्वेच्या ट्रकमधून चालत आलेलो आहोत, आपली कोरोना तपासणी करा, मगच आम्हाला गावी सोडा असा फोन केला होता. या फोनमुळे फणसू आरोग्य केंद्रातील अधिकारी वैद्यकीय अधिकारी आपली सुमो घेऊन थेट खेड येथे रवाना झाले. या सर्वांना सुमो मध्ये टाकून त्यांनी त्यांची कोरोना चाचणी करण्यासाठी दापोली उपजिल्हा रुग्णालयात आणले. येथून या सर्वांची रवानगी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या शेतकरी भवनात उभारण्यात आलेल्या विलगीकरण केंद्रात करण्यात आली.