काँग्रेसच्या डीएनएमध्ये फूट पाडणारी मानसिकता, पंतप्रधान मोदींचा लोकसभेत पलटवार
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी लोकसभेत काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. काँग्रेसच्या डीएनएमध्ये फुटीरतावादी मानसिकता शिरली आहे. ‘फोडा आणि राज्य करा’ हे काँग्रेसचे धोरण आहे. इंग्रज गेले असले तरी काँग्रेसने ‘फूट पाडा आणि राज्य करा’ हे धोरण आपले चारित्र्य बनवले आहे. त्यामुळेच आज काँग्रेस पक्ष ‘तुकडे-तुकडे गँग’चा म्होरक्या झाला आहे. सत्तेत येण्याची काँग्रेस पक्षाची ताकद संपल्यामुळेच इतरांना बिघडवण्याचे उपद्व्याप त्यांच्याकडून सुरू आहेत, असे विविध शाब्दिक आरोप करत पंतप्रधानांनी काँग्रेसला टार्गेट केले. आता मंगळवारी राज्यसभेमध्येही पंतप्रधान अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला उत्तर दिले. याप्रसंगी विविध शेरो-शायरींचा आधार घेत पक्षाबरोबरच राज्य आणि वैयक्तिक पातळीवरही त्यांनी झाडाझडती घेतली. यावेळी सभागृहात काही विरोधी पक्षाच्या नेत्यांनी गोंधळही घातला. मात्र पंतप्रधानांनी आपल्या जवळपास दीड तासाच्या भाषणात विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. एकापाठोपाठ एक होणाऱया पराभवानंतरही काँग्रेसचा अहंकार गेलेला नाही. उत्तर प्रदेश, बिहारमध्ये काँग्रेसला मते नाहीत. गोव्यात पुन्हा सत्ता मिळाली नाही. मतदार काँग्रेसला नाकारत आहेत असे असताना विरोधक 2014 च्या मानसिकतेतून बाहेर आलेले नाहीत, असे पंतप्रधान म्हणाले. तसेच आम्हाला उपदेश करताना काँग्रेस सत्तेतील 50 वर्ष विसरत असल्याचा ‘चिमटा’ही पंतप्रधानांनी काढला.
कोरोनाकाळात ‘राजकारण’ महाराष्ट्र, दिल्ली सरकार टार्गेट
काँग्रेसला अहंकारी असल्याचे सांगून पंतप्रधान म्हणाले की, संपूर्ण जग कोरोना महामारीशी झुंज देत असताना काही विरोधी पक्ष निव्वळ राजकारण करत होते. कोरोनाच्या संकटावेळी देश लॉकडाऊन पाळत असताना काँग्रेसच्या नेत्यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या. गांगरून गेलेले लोक शांत असताना लोकांना घरी परतण्यासाठी काँग्रेसच्या नेते-कार्यकर्त्यांकडून हुल दिली जात होती. याचे प्रत्यंतर दिल्ली-मुंबई येथील स्थितीवरून स्पष्टपणे दिसत होते. या स्थितीला सर्वस्वी तेथील राज्य सरकार जबाबदार असल्याचा ठपका पंतप्रधानांनी आपल्या भाषणातून ठेवला.
राहुल गांधी, पी. चिदंबरम यांचा ‘समाचार’
राहुल गांधींच्या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आज संपूर्ण देश एकजुटीने आणि ताकदीने आमच्या पाठीशी उभा आहे. सीडीएस जनरल बिपिन रावत यांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन झाल्यानंतर त्यांचे पार्थिव तामिळनाडूतील विमानतळाकडे जात असताना लाखो तामिळी बंधू-भगिनी कित्येक तास रस्त्यावर उभे होते. यावेळी त्यांनी केलेली प्रार्थना आणि ढाळलेले अश्रू देशवासियांनी पाहिल्याचे पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधान मोदींनी माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्यावरही हल्ला चढवला. चिदंबरम आज-काल वृत्तपत्रांमध्ये अर्थव्यवस्थेवर लेख लिहित आहेत. पूर्वी महागाई कमी करण्यासाठी कोणत्याही जादूची अपेक्षा करू नका अशी वक्तव्ये करणारे हे ‘महाशय’ आता महागाईच्या मुद्दय़ावर सरकारला डोस पाजत असल्याचा ‘खुराक’ पंतप्रधानांनी दिला.
पं. नेहरूंच्या भाषणाचा उल्लेख
‘गरीब हटाओ’ या घोषणेमुळे काँग्रेसने अनेक निवडणुका जिंकल्या पण त्यात अपयश आल्याचे मोदी म्हणाले. तेव्हा देशातील गरिबांनी त्यांना मतदान केले. महागाईवर देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लाल किल्ल्यावरून भाषण करताना कधीकधी कोरियातील लढाईचा आपल्यावरही परिणाम होतो असे म्हटले होते. तसेच अमेरिकेतील कोणत्याही प्रकारच्या अशांततेमुळे महागाईही वाढली आहे, असे दाखलेही पंतप्रधानांनी दिले.
बदल करण्याची संधी दवडुया नको!
दुसऱया महायुद्धानंतर जागतिक पातळीवर बरेच बदल झाले. त्याचप्रमाणे आताही कोरोनानंतर आता पुन्हा एकदा जग नव्या वर्ल्ड ऑर्डरच्या दिशेने प्रवास करत आहे. जगामध्ये बदलाचे वारे वाहत आहेत. ही संधी भारताने आपल्या हातून सोडू नये, भारताला एक महत्त्वाचा देश म्हणून उभारणे गरजेचे आहे. देशाच्या अमृत महोत्सवाच्या वषी आपण काही संकल्प केल्यास, पूर्ण शक्तीने काम केल्यास त्याचा परिणाम सकारात्मक होईल असे प्रतिपादन पंतप्रधानांनी केले.
योजना-प्रगतीचाही मांडला लेखाजोखा
गेल्या काही वर्षात नवे संकल्प घेऊन देश पुढे जात आहे. पायाभूत सुविधेत भारताने वेगाने प्रगती केली. पंतप्रधान आवास योजनेमुळे गरिबांना घरे मिळाली आहेत. वीज, पाणी या सुविधाही आता देशाच्या कानाकोपऱयात पोहोचल्या आहेत. कोरोनाकाळातही सरकारने यशस्वीपणे जनतेला मदतीचा हात दिला. मोफत धान्याचे वाटप करून सरकारने जागतिक पातळीवर आपली ताकद सिद्ध केली. लोकांची आर्थिक पत वाढवण्यासाठी सरकार विविध योजना राबवत आहेत. भविष्यातही अशाप्रकारच्या जनकल्याणकारी योजना सुरू ठेवून सरकार सर्वांना मदतीचा हात देईल, अशी हमी पंतप्रधानांनी दिली.