प्रतिनिधी / सांगली
मराठा समाजाने एकत्रित आले पाहिजे. दबाव गट निर्माण केला पाहिजे. तरच आरक्षण मिळेल. प्रसंगी तुम्ही नेतृत्व करा, पण एकसंघ व्हा अशी साद समरजितसिंह घाटगे यांनी मराठा संघटनांना घातली आहे. राज्य शासनाने तात्काळ मागासवर्गीय आयोग स्थापन करावा, पुनर्विचार याचिका दाखल करावी, एसईबीसी अंतर्गत निवड झालेल्या मराठा समाजाच्या २१८५ विद्यार्थ्यांना नियुक्त्या द्याव्यात अशी मागणीही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.
आरक्षण रद्द झाल्याने मराठा समाजामध्ये प्रचंड खदखद निर्माण झाली आहे. समाज अस्वस्थ आहे, असे सांगत राजे घाटगे म्हणाले, पक्षाचा झेंडा बाजूला ठेवून समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या मराठा क्रांती मोर्चासह सर्व मराठा संघटनांशी चर्चा केली. त्यांची मते जाणून घेतली. देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात मराठा समाजाने ५१ मोर्चे काढले. सरकारवर दबाव निर्माण केला, म्हणून आरक्षण मिळाले. आताही या सरकारवर दबाव निर्माण करण्याची गरज आहे. यासाठी समाजाने एकत्र येण्याची गरज आहे. तरच समाजाला आरक्षण मिळेल.