सातारा / प्रतिनिधी :
मराठा आरक्षणासाठी आंदोलन करण्यापेक्षा तुम्ही निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना आडवा. त्यांना घरातून बाहेर पडून देऊ नका. आरक्षण का मिळाले नाही, याचा जाब विचारा. त्यातून तुमचे समाधान झाले नाही तर माझ्यासह सर्वांना घराबाहेर फिरू देऊ नका. समाजामुळे आमच्यासारखे लोकप्रतिनिधी आहेत. माझ्यामुळे समाज आहे, अशा मस्तीत आमदार व खासदारांनी राहू नये. मराठा समाजाने ठरविले तर तुमची मस्ती एका दिवसांत उतरवतील, असा इशारा साताऱ्याचे भाजपचे खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी दिला.
मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले. त्यानंतर उदयनराजेंच्या प्रतिक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आज तिसऱ्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयात कामानिमित्त आलेल्या उदयनराजेंनी मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, इतरांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिले गेले पाहिजे. बाकीच्या समाजाला आरक्षण दिले गेले, त्यावेळी इतका अभ्यासही केला गेला नव्हता. गायकवाड आयोगाच्या अहवालावर अभ्यास करून आरक्षण देण्यात आले होते. मराठा समाजात आमदार, खासदार मंत्री आहेत, किती आहेत. पाच टक्के असतील 95 टक्के लोक गरीबच आहेत. सिलिंगमध्ये मराठ्याच्या जमिनी गेल्या. शिक्षणात ही आरक्षण ठेवणार नसाल तर शासन करतंय काय?
मी कोणत्या पक्षाच्यावतीने अथवा समाजाच्यावतीने नव्हे तर नागरीक म्हणून म्हणणे मांडत आहे, असे सांगत उदयनराजे म्हणाले, हा न्यायालयाचा निकाल असला तरी आता लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे. सर्वच जातीच्या आर्थिक दृष्ट्या दुर्बलांना आरक्षण दिले गेले पाहिजे. याची आमदार, खासदारांची जबाबदारी नाही का, ते का भाष्य करत नाहीत. मी मागेच याविषयी चर्चा झाली त्यावेळी श्वेत पत्रिका काढा. वकिल थांबत नाहीत, हजर राहत नाही. दुसऱ्यावर बोट दाखवायचे कशासाठी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना आडवा. त्यांना घरातून बाहेर पडून देऊ नका. त्यांना बोलते करा. त्यांच्या उत्तराने समाधान झाले नाही तर तुम्हाला अधिकार आहे. कोणालाच बाहेर फिरून देऊ नका. मग उदयनराजे असतील तरीही त्यांनाही फिरून देऊ नका. समाजामुळे आमच्यासारखे लोकप्रतिनिधी आहेत. माझ्यामुळे समाज आहे, अशा या मस्तीत त्यांनी राहू नये. या सर्वांनी ठरविले तर तुमची मस्ती एका दिवसांत उतरवतील, असा इशारा ही त्यांनी दिला.
केंद्राकडे बोट दाखवू नका
आरक्षण प्रश्नी तुम्ही पंतप्रधानांशी बोलणार आहात का? याप्रश्नी उदयनराजे म्हणाले, भेटण्याचा प्रश्न नाही. राज्य शासन काय करतंय, त्यांच्या अखत्यारीतील हा विषय असून केंद्राकडे बोट दाखवू नका, तुम्ही आजपर्यंत काय केले ते सांगा. राज्य सरकारचे अपयश आहे का, यावर ते म्हणाले, जाती जातीत तेढ निर्माण करून सत्तेची पोळी भाजून घ्यायचा उद्योग चालला आहे. एखाद्याला मागायवर्गीय म्हणायचा अधिकार मला दिला कोणी. मग मी ओबीसी म्हणून एकमेकांशी बोलणे सोडून द्यायचे का, यांची माणुसकी कुठे गेली आहे. मी माझी भूमिक सांगितली आहे. लवकरच सविस्तर भूमिका मांडली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.