सेवाव्रत प्रतिष्ठानचे अन्नदानसेवेचे व्रत, कोरोनाबाधित रूग्णांच्या नातेवाईकांना आपुलकीचे दोन घास
कोरोना रूग्णांच्या नातेवाईकांना जेवणाचे पॅकेटस् देण्यापूर्वी दररोज दुपारी सेवाव्रत प्रतिष्ठानचे कार्यकर्ते तयारीला लागतात
कोल्हापूर / संजीव खाडे
लॉक डाऊनमुळे सर्व व्यवहार बंद असताना कोरोनाबाधित रूग्णांवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना त्यांच्या नातेवाईकांची मानसिक स्थिती आणि अवस्था कशी असेल? याची कल्पना केलेली बरी. एकीकडे रूग्णाच्या प्रकृतीचे टेन्शन आणि दुसरीकडे स्वतःच्या जेवणाची चिंता. कोरोना रूग्णाच्या नातेवाईकांची ही व्यथा हिंदूत्ववादी कार्यकर्ते आणि सेवाव्रत प्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी उर्फ बंडा साळुंखे यांच्या नजरेतून सुटली नाही. त्यातून अन्नदानाच्या सेवेची कल्पना पुढे आली आणि तिला मूर्त स्वरूप आले. गेले 23 दिवस कोरोना रूग्णांच्या नातेवाईकांना दररोज संध्याकाळी पोटभरून जेवण देण्याचे कार्य अविरतपणे साळुंखे आणि त्यांचे सारे सहकारी करत आहेत.
कोरोनाच्या पहिल्या संकटकाळात बंडा साळुंखे आणि त्यांच्या सहकाऱयांनी शहरातील गायी, म्हशीं आदी मुक्या जनावरांना चारा देण्याचे कार्य पेले होते. शहरातील फिरस्त्यांबरोबर इतर गरजूंना नाष्टा, जेवण दिले होते. कोरोनच्या दुसऱया संकटकाळात शहरातील स्थिती गंभीर आहे. लॉकडाऊन सुरू असताना सीपीआरसह शासकीय आणि खासगी हॉस्पिटलमध्ये हजारो कोरोना रूग्णांवर उपचार सुरू आहेत. या रूग्णांत जिल्हÎातील ग्रामीण भागातील रूग्णांसह सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिमाभागातील रूग्णांचा समावेश आहे. या रूग्णांचे कोल्हापुरात नातेवाईक, मित्र नसतील तर अडचणी निर्माण होतात. लॉकडाऊनमध्ये सर्वच बंद असल्याने रूग्णाचे नातेवाईक आणखीन टेन्शनमध्ये आले आहे. बंडा साळुंखे यांनी या रूग्णांच्या नातेवाईकांना संध्याकाळी पोटभरून जेवण पोच करण्याचा निर्णय घेतला आणि कामही सुरू केले.
दररोज सकाळी भाजी व इतर पदार्थांची खरेदी झाल्यानंतर दुपारी तीनच्या सुमारास जेवण बनविण्याची तयारी सुरू होते. सर्व कार्यकर्ते आपापली जबाबदारी पार पाडतात. चार साडेचारच्या दरम्यान भात, आमटी, भाजी, चपाती आणि शिरा, आमरससारखा गोड पदार्थ तयार झाल्यानंतर पाच वाजता पदार्थांचे पॅकिंग केले जाते. तासाभरात पॅकिंग झाल्यानंतर सातच्या सुमारास बंडा साळुंखे आणि त्यांचे सहकारी जेवण वाटपासाठी जीप घेऊन बाहेर पडतात. शहरातील सीपीआरसह काही खासगी हॉस्पिटलमध्ये जाऊन तेथील रूग्णांच्या नातेवाईकांना आपुलकीने जेवणाची पॅकेटस् देतात. मानसिक आधारही देतात. दररोज दोनशे जणांना जेवण दिले जाते. तुम्ही काळजी घ्या, आम्ही जबाबदारी घेतो, या आपुलकीने गेले 23 दिवस हे कार्य अविरतपणे सुरू आहे. या कार्यात पाटीदार पटेल समाज, रोटरी क्लब, महाराष्ट्र हायस्कूलची 2003 ची बॅच, साधना ऑईल, किशोर शहा, डी. डी. जाधव गुप, आण्णा गुप आदी शहरातील व्यापारी, संघटना यांचाही हातभार लागत असल्याचे बंडा साळुंखे सांगतात.
रूग्णांनाही वरण भाताचे दोन घास
उपचार सुरू असलेल्या कोरोना रूग्णाला जर वरण भाताची गरज लागली. रूग्णाच्या नातेवाईकांनी तशी पूर्व कल्पना दिली तर वरण भात देण्याचीही सुविधा सेवाव्रत प्रतिष्ठानने दिली आहे.
सेवाव्रतचे शिलेदार
मयूर जाधव, मनिष शहा, सागर साळोखे, यश साळोखे, विजय मांगोरे, महेश लाड, सनी तेंडकर, ऋषिकेश कोकीतकर, नितेश कोकीतकर, सचिन दोशी, शुभम जाधव, शुभम नाईक, संग्राम मोहिते, रमेश भोपळे, अवधूत भाटे, सागर सोनार, सुधीर सूर्यवंशी, कृष्णात साळोखे.
करवीर निवासिनी आई अंबाबाईच्या नगरीत कोरोनाच्या संकटकाळात कुणीही गरजू उपाशी राहू नये, या उद्देशाने कोरोना रूग्णांच्या नातेवाईकांना संध्याकाळाचे जेवण देण्याचा उपक्रम राबवित आहोत. सर्वांची मदत, पाठबळाने हे शक्य झाले आहे. – संभाजी उर्फ बंडा साळुंखे, अध्यक्ष सेवाव्रत प्रतिष्ठान, कोल्हापूर