प्रतिनिधी/ बेळगाव
एपीएमसी ते कंग्राळी खुर्द रस्त्याचे कामकाज कधी सुरु केले जाते कधी बंद केले जाते, हे ब्रम्हदेवालाही कळेनासे झाले आहे. अचानकपणे कंत्राटदार येतो कामाला सुरुवात करतो आणि दुसऱया दिवशी तेच काम बंद करतो. त्यामुळे जनतेच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होत आहे. काहीही करा पण पावसाळय़ापूर्वी हा रस्ता पूर्ण करा, अशी मागणी जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती पाटील यांनी निवेदनाव्दारे केली आहे.
गेल्या दोन वर्षांपासून या रस्त्यासाठी आम्ही पाठपुरावा करत आहोत. स्मार्टसिटी अंतर्गत काही भाग येत आहे. स्मार्टसिटीचे अधिकारी केवळ आश्वासन देत आहेत. आश्वासना व्यतीरिक्त त्यांनी आजपर्यंत काहीच केले नाही. नेमकी समस्या तरी काय आहे? हे सांगा, अशी विचारणा सरस्वती पाटील यांनी केली. या रस्त्यावर खडी टाकण्यात आली आहे. बाजुला चरी मारण्यात आल्या आहेत. त्यामुळे अपघात घडत आहेत.
या सर्व प्रकारांवरुन तुम्हाला जनतेच्या जीवाशी खेळायचे आहे का? हे तरी स्पष्ट करा. या रस्त्यावरुन जवळपास 25 हून अधिक गावचे नागरिक धावाधाव करत आहेत. महाराष्ट्रातीलही वाहने या रस्त्यावरुनच ये-जा करतात. एपीएमसी सारखे मार्केट या ठिकाणी आहे. जे सर्वात अधिक उत्पन्न प्रशासनाला देत आहे. असे असताना रस्त्याकडे का दुर्लक्ष होत आहे, असा प्रश्नही त्यांनी केला. जर अशीच अवस्था राहिली तर आम्हाला पुन्हा रास्तारोकोसाठी रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे. शिरस्तेदार मंजुनाथ जानकी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी गाव सुधारणा समितीचे आर. आय. पाटील उपस्थित होते.