पावसाचे पाणी साचून खड्डे पडल्याने अपघातांच्या घटना
वार्ताहर /उचगाव
बेळगाव-बाची मार्गावरील तुरमुरी गावाजवळील युनियन बँकेसमोर रस्त्यावर साचत असलेल्या पावसाच्या पाण्याला कधी वाट मोकळी करून देणार, अशी विचारणा ये-जा करणाऱया असंख्य प्रवासीवर्गातून केली जात आहे. गेल्या दोन-चार दिवसांत झालेल्या मुसळधार पावसाने या ठिकाणी अनेक जणांच्या दुचाकी खड्डय़ात पडून चालकांना दुखापती झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
गेल्या 2-4 वर्षांपासून या ठिकाणी साचणाऱया पाण्याला अद्याप मार्ग करून न दिल्याने रस्त्याला नाल्याचे स्वरुप आले आहे. सदर रस्त्यावर उन्हाळय़ामध्ये अवकाळी पावसाचे पाणी तर पावसामध्ये पावसाचे पाणी साचत असल्याने या ठिकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाले असून साचलेल्या पाण्यामुळे खड्डे दिसून येत नाहीत. रस्त्यावरून ये-जा करणाऱया अनेक प्रवाशांच्या दुचाकी तसेच चार चाकी वाहने खड्डय़ात अडकल्याने दुचाकीवरील अनेकजण पडून दुखापती झाल्याच्या घटना घडत आहेत. मात्र, याकडे अद्याप ग्रा. पं. अथवा सार्वजनिक बांधकाम खात्याने दखल न घेतल्याने प्रवासी आणि नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे. येथे साचणाऱया पाण्याला वाट करून द्यावी, अशी मागणी प्रवासी आणि नागरिकांतून करण्यात येत आहे.