वार्ताहर/ उचगाव
तुरमुरी येथील शेतवडीत असलेल्या विहिरीच्या बाजूच्या डबक्मयात पडून मण्णूरच्या अकरा वर्षांच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमाराला घडली.
याबाबतची माहिती अशी की, मण्णूर येथील मनाली मल्लाप्पा चौगुले (वय 11) ही इयत्ता पाचवीच्या वर्गात शिकणारी मुलगी सोमवारी सकाळी तुरमुरी येथील खाचो लक्ष्मण जाधव या आपल्या मामांच्या घरी आली होती. जाधव कुटुंबीय मनालीसमवेत शेतामध्ये बटाटे बियाणाची लागवड करण्यासाठी गेले होते. शेतामध्ये असलेल्या विहिरीजवळ जुलै-ऑगस्ट दरम्यान झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठा खड्डा पडला होता. यात चिखल व पाणी साचले होते. मनाली या खड्डय़ात घसरून पडली व ती चिखलामुळे गाडली गेली. श्वास कोंडून ती जागीच गतप्राण झाली.
जाधव कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला असता ती या खड्डय़ात मृतावस्थेत आढळल्याने सर्वांनी हंबरडाच फोडला. मनालीच्या पश्चात आई-वडील तीन बहिणी व एक भाऊ असा परिवार आहे.