काश्मीरप्रकरणी सौदी अरेबिया, इराणने दिला मोठा झटका : पश्चिम आशियात भारताचा प्रभाव
वृत्तसंस्था/ रियाध, तेहरान
पाकिस्तानात सत्तेत आल्यापासूनच मुस्लीम देशांच्या बळावर फुशारक्या मारणारे पंतप्रधान इम्रान खान यांना शिया आणि सुन्नी दोन्ही गटांकडून काश्मीरच्या मुद्दय़ावर मोठा झटका बसला आहे. सौदी अरेबिया आणि इराणने स्वतःच्या देशातील पाकिस्तानी दूतावासांना 27 ऑक्टोबर रोजी जम्मू-काश्मीरच्या भारतातील विलीनीकरणाच्या दिनी काळा दिवस पाळण्यास अनुमती नाकारली आहे. सौदी अरेबिया आणि इराणने यापूर्वीची भूमिका बदलल्याने पश्चिम आशियातून पाकिस्तानला मोठी निराशा पत्करावी लागली आहे.
इराणमधील पाकिस्तानी दूतावासाने तेहरान विद्यापीठात काळा दिन साजरा करण्यासाठी एक कार्यक्रम करण्याचा प्रस्ताव दिला होता. पाकिस्तानच्या या प्रस्तावावर इराणने आश्चर्यकारक पद्धतीने अनुमती नाकारली आहे.
पाठिंबा मिळविण्यास अपयश
कलम 370 हद्दपार करण्यात आल्यावर मुस्लीम देशांचेही समर्थन प्राप्त करण्यास पाकिस्तान अपयशी ठरल्याचे इराणच्या या कृतीमुळे स्पष्ट झाले आहे. पाकिस्तानला सौदी अरेबियाची राजधानी रियाधमध्येही कार्यक्रम आयोजित करण्याची अनुमती मिळालेली नाही. प्रभावी मुस्लीम देश सौदी अरेबिया आणि इराणकडून पाकिस्तानला बसलेला हा झटका क्षेत्रातील बदलती समीकरणे दर्शविणारा आहे.
सौदी अरेबिया दुरावला
भूतकाळात सौदीच्या अर्थकृपेवर अवलंबून असलेल्या पाकिस्तानने आता तुर्कस्तानचे ‘नेतृत्व’ स्वीकारले आहे. याचबरोबर पाकिस्तानी विदेश मंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी तुर्कस्तानसोबत मिळून सौदी अरेबियाला वगळून आणखीन एक इस्लामिक गट निर्माण करण्याचा इशारा दिला होता. यानंतर सौदी अरेबिया आणि पाकिस्तानचे संबंध दुरावले आहेत. तुर्कस्तानचे अध्यक्ष रेसेपे तैयब एर्दोगान यांनी पश्चिम आशियात स्वतःचा प्रभाव वाढविण्यासाठी 500 वर्षे जुन्या ऑटोमन साम्राज्याच्या धर्तीवर देशाला नेण्याचा प्रयत्न चालविला आहे.