आ. प्रकाश आबिटकर यांची मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांचेकडे मागणी
वार्ताहर / धामोड
राधानगरी तालुक्यातील तुळशी मध्यम प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांना वाटप करण्यात आलेल्या देवस्थानच्या जमिनी प्रकल्पग्रस्तांच्या नावे करण्याची मागणी आमदार प्रकाश आबिटकर यांनी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचेकडे केली. मुंबई येथील मंत्रालयात १२ ऑगष्ट रोजी झालेल्या बैठकीमध्ये त्यांनी ही मागणी केली.
तुळशी मध्यम प्रकल्पाच्या कामाची सुरवात सन १९६५ च्या दरम्यान झाली. त्यावेळी प्रकल्पाच्या कामाकरीता शासनाने शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी ३५ते ४० वर्षापुर्वी देवस्थानच्या जमिनी अकरा महिन्यांच्या करार पध्दतीने कसण्या करीता वाटप केल्या होत्या. परंतू कालपरत्वे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना वाटप केलेल्या जमीनींवर कर्जे काढणे, त्यांची खरेदी अथवा विक्री करणे यासह अन्य खाजगी कामाकरीता वापरता येत नव्हत्या . परिणामी प्रकल्पग्रस्तांना अनेक अडचणींना सामोरे जावे लगात होते. प्रकल्पग्रस्तांनी समस्यांचे गाऱ्हाणे आमदार आबिटकर यांचे समोर मांडले होते.
प्रकल्पग्रस्तांनी सदर जमीनी बदलून अथवा नावे करण्याबाबतची मागणी आमदार प्रकाश आबिटकर यांचेकडे लावून धरली होती. याबाबत वेळोवेळी प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांबाबत जिल्हाधिकारी यांचे स्तरावर बैठकाही घेण्यात आल्या पंरतू तोडगा निघत नसल्याने प्रकल्पग्रस्त हवालदिल झाले होते. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आमदार आबिटकर यांनी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री वडेट्टीवार यांचे समवेत बैठक घेवून सदर बाब मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिली.
यावेळी बोलताना मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले, तुळशी प्रकल्पग्रस्तांना तत्कालीन जमीनी वाटप करतेवेळी सदर जमीनी या देवस्थान असल्याबाबत शहानीशा न करता वाटप करण्यात आल्या असाव्यात. यामध्ये प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा कोणताही दोष नाही. परंतू आज याबाबत जर धोरणात्मक निर्णय घ्यावयाचा झाल्यास सदर जमीन वर्ग-२ वरून वर्ग -१ कराव्या लागतील .याकरीता जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांनी याबाबतचा स्वयंस्पष्ट अहवाल शासनास पाठवून द्यावा. याबाबत धोरणात्मक निर्णय घेवून तुळशी प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांना वाटप करण्यात आलेल्या देवस्थानच्या जमीनी प्रकल्पग्रस्तांच्या नावे करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल असे सांगितले.