हरदोईमध्ये पंतप्रधान मोदींचा समाजवादी पक्षावर निशाणा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी उत्तरप्रदेशच्या हरदोईमध्ये भाजपकरता प्रचारसभा घेतली आहे. हरदोईमध्ये चौथ्या टप्प्याच्या अंतर्गत 23 मार्च रोजी मतदान होणार आहे. सभेला संबोधित करताना मोदींनी समाजवादी पक्षावर जोरदार शाब्दिक हल्ला चढविला आहे. समाजवादी पक्षाने कशाप्रकारे कट्टा (गावठी पिस्तूल) आणि सट्टावाल्यांना मोकळीक दिली होती हे हरदोईच्या लोकांनी अनुभवले असल्याचे मोदी यांनी म्हटले आहे.
हरदोईच्या पुण्यभूमीशी होळीसारख्या पवित्र सणाचा संबंध आम्ही सर्वजण जाणतो. यंदा हरदोई आणि उत्तरप्रदेशच्या लोकांनी 2 वेळा रंगांची होळी खेळण्याची तयारी केली आहे. पहिली होळी 10 मार्च रोजी भाजपच्या प्रचंड विजयासह साजरी केली जाणार आहे. परंतु 10 मार्च रोजी धूमधामपणे होळी साजरी करायची असल्यास याची तयारी सध्या मतदान केंद्रात करावी लागेल, घरोघरी जावे लागणार असल्याचे मोदींनी उपस्थित जनसमुदायाला उद्देशून म्हटले आहे.
सप काळात भयाचे वातावरण
तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे पूर्वी आमचे सण रोखणाऱयांना उत्तरप्रदेशच्या जनतेचे प्रत्युत्तर मिळणार आहे. 5 वर्षांपूर्वी माफियावाद्यांनी उत्तरप्रदेशची काय अवस्था करून ठेवली होती? व्यापाऱयांना व्यापार करण्यास भीती वाटत होती. लूट, दरोडे, चोरी या घटना नित्याच्याच ठरल्या होत्या. काळोख पडण्यापूर्वी लोक घरी परतत होते. परंतु योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने गुंडगिरी मोडून काढल्याने लोक आता मोकळा श्वास घेत असल्याचे मोदी म्हणाले.
गरीब, शेतकरी अन् तरुणाईचे सरकार
उत्तरप्रदेशात जनतेने ज्या डबल इंजिनच्या सरकारला आशीर्वाद दिला आहे, ते एका घराण्याचे सरकार नाही. दिल्लीतील भारत सरकार कुठल्याही एका घराण्याचे सरकार नाही. हे गरीब, शेतकरी आणि तरुणाईचे सरकार आहे. आम्ही 5 वर्षे जनतेसाठी मोठी मेहनत केली आहे. 2014-2017 दरम्यान उत्तरप्रदेशात या घराणेशाहीवाद्यांनी एकाही कामात मला साथ दिली नसल्याचे दुःख असल्याचे मोदींनी म्हटले आहे.
अहमदाबाद बॉम्बस्फोटांचा उल्लेख
गुजरातचा मुख्यमंत्री असताना अहमदाबादमध्ये देखील साखळी बॉम्बस्फोट झाले होते. तो दिवस कधीच विसरू शकत नाही. माझे सरकार या दहशतवाद्यांना पाताळातूनही हुडकून काढत शिक्षा करणार असा संकल्प मी त्या दिवशी घेतला होता. काही दिवसांपूर्वीच अहमदाबाद बॉम्बस्फोटाच्या गुन्हेगारांना शिक्षा मिळाल्याचे सर्वांनी पाहिले असेल. आम्हा भारतीयांना उद्ध्वस्त करू पाहणाऱयांना न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. अनेक दहशतवाद्यांना मृत्युदंड ठोठावण्यात आल्याचे उद्गार मोदींनी सभेत बोलताना काढले आहेत.
सप-काँग्रेसला दहशतवाद्यांबद्दल ममत्व
2006 मध्ये काशीत आणि 2007 साली लखनौ, अयोध्येत झालेल्या बॉम्बस्फोटांचा उल्लेख करत पंतप्रधान मोदींनी समाजवादी पक्षावर टीका केली आहे. समाजवादी पक्षचे सरकार सत्तेवर असताना उत्तरप्रदेशात दहशतवाद्यांवरील खटले मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. हे लोक स्फोट घडवून आणत होते आणि समाजवादी पक्षाचे सरकार या दहशतवाद्यांवर खटले चालविण्याची अनुमती देत नव्हते. समाजवादी पक्ष आणि काँग्रेसच्या नेत्यांची भूमिका आणखीनच धोकादायक राहिली आहे. हे लोक ओसामा लादेनचा उल्लेख आदरार्थी करतात. बाटला हाउस चकमकीत दहशतवाद्यांच्या खात्म्यानंतर अश्रू ढाळण्याचे काम सप आणि काँग्रेसचे नेते करत असल्याचा आरोप मोदींनी केला आहे.