संपूर्ण आशिया खंडभर मोठय़ा श्रद्धेने, भक्तीने आणि आदराने ज्याचं पूजन केलं जातं, ज्याला साऱया कलांचा अधि÷ाता म्हणून सकल देवतांनीच गौरवलेलं आहे, त्या गणनायकाला आपण आवाहन केलेलं आहे. दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस, अकरा दिवस तर कुठे कौतुकाचा, नवसासायासाचा बाप्पा एकवीस दिवसही पुजला जातो. या साऱया दिवसांत त्या गणरायासाठी काय आणि किती करू असं प्रत्येक गणेशभक्ताला होऊन गेलेलं असतं. कुणी त्याच्यासाठी नेत्रदीपक सजावट करतं, तर कुणी उत्तमोत्तम पदार्थ घडवून त्याला नैवेद्य दाखवतात, कुणी खोलीभर अतिशय कलात्मक आणि सुंदर सुबक अशा रांगोळय़ा काढतात. कुणी आपल्या हस्तकलेच्या आविष्काराने त्याची पूजा करतात तर कुणी त्याच्यासमोर बसून संगीताने त्याची सेवा करतात. तालासुरात, आरत्या, भजनं, मंत्रघोष, सहस्त्रावर्तनंही करतात. आणि या सगळय़ात ती नेत्रसुखद, परमपवित्र वाटणारी साक्षात संवाद करेल अशी वाटणारी जिवंत गणेशमूर्ती घडवणारे कारागीर तर सर्वात महत्त्वाचे! सगुणातून निर्गुणाच्या संगाकडे जाणाऱया प्रत्येक भक्ताच्या समोर ते सगुण रूप साकार करणारे हे शिल्पकलाकार अर्थात बिनीच्या शिलेदाराची भूमिका बजावतात. या सर्वच गोष्टींचा आपण तर्कशुद्ध विचार करत गेल्यास लक्षात येतं की या सर्वच्या सर्व कला चौसष्ट कलांपैकी असणाऱया कलाच होत. शिल्पकला, चित्रकला, रांगोळीरेखन, पाककला, गायनकला, वादनकला, नृत्यकला, नाटय़कला या सगळय़ा कलांचा एकत्रित आणि सातत्यपूर्ण आविष्कार गणेशोत्सवाच्या निमित्ताने घडत असतो. सकल कलांचा अधिपती असलेला गणेशही मग आपल्याला आपल्यापैकीच एक वाटायला लागतो. त्याच्यासमोर भजनासाठी बसलेला भगिनीवर्ग मग आपलं मूलच समजून त्याला तालासुरात आवाहन करतो.
गजानना रे गजानना
नाचत यावे रंगणा
पुरवावी मनकामना
इतक्मया आर्जवाने केलेलं आवाहन पाहून त्याला खरंच आसन सोडून त्यांच्यात येऊन बसावं वाटणारच!
लवकर यावे सिद्धगणेशा
आतमध्ये कीर्तन वरुन तमाशा
असं म्हणून तमासगीरही आपल्या वगाच्या सुरवातीला त्याला आवाहन करतात.
गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमही
गुणशरीराय गुणमंडिताय गुणेशानाय धीमही
यांसारख्या संस्कृत श्लोकांत गुंफूनही हे सुरेल गुणवर्णन होतं. खरोखरच गणपती बाप्पा येताना किती आनंद आपल्यासोबत घेऊन येतो!
‘देव भावाचा भुकेला’ असं म्हटलं जातं. कारण कितीही उत्तमोत्तम वस्तू त्याच्यासमोर ठेवल्या, किती महागामोलाचे वस्त्रालंकार त्याला अर्पण केले, किंवा पंचपक्वान्नांचे डोंगर जरी नैवेद्यासाठी रचले आणि अर्पण करणाऱयाच्या मनात जर विनीतभाव नसेल, प्रेमभाव नसेल तर त्याचा उपयोग शून्य होतो. सर्व सृष्टीचा निर्माता असलेल्या त्याला, त्यानेच निर्माण केलेल्या किंवा त्यानेच दिलेल्या बुद्धीचा वापर करून तयार केलेल्या वस्तूंची काय मातब्बरी? देवाला हवं असतं ते एक म्हणजे त्याला भजणाऱयाचं एकचित्त आणि हेच एकचित्त जर का त्याच्याठायी एकवटलं तर मग पूजेसाठी कोणत्याच बाह्य उपचार किंवा अवडंबराची गरजच राहत नाही. ज्या वेळी कोणतीही तयारी हाताशी नसते तेव्हाही देवाची पूजा अगदी नक्की करता येते. पं. राम मराठे जितके दिवस ठाण्यात आपल्या घरी असत तितके दिवस रोज सकाळी नियमितपणे कौपिनेश्वराच्या मंदिरात जाऊन त्याची स्वरपूजा बांधत असत. तबला पेटी तर नसेच, पण अगदी तानपुराही हाताशी नसताना ही आळवणी चालत असे. ती ऐकायला आसपास हजर असलेल्या मंडळींचंही त्यांना भान नसे. इतक्मया तन्मयतेने ती त्यांची आराधना चालत असे.
पं. प्रभाकर कारेकर यांनी गायलेलं एक अप्रतिम गीत आहे. एखाद्या गायक कलाकाराने परमेश्वराची सेवा कशी करावी, देवाला त्याने काय आणि कसं अर्पण करावं याचं जे वर्णन त्यात केलं गेलं आहे ते केवळ अनुपम आहे. एक एक शब्द तोलून मापून रचलेलं हे गाणं अतिशय श्रवणीय असून ते आजही तितकंच ताजं वाटतं. पंडितजींच्या किंचित सानुनासिक खास स्वरांत ते कानावर पडलं की ते संपूच नये असं वाटतं.
तुझी मूर्त सुंदर देवा सजवितो सुरात
लागते समाधी माझी स्वरांच्या जगात
इथेच ऐकणाऱयाला कळून चुकतं की या पूजकाचं पूजेचं माध्यम स्वर आणि ताल हेच आहे. या गाण्याचं वैशिष्टय़ असं की ज्या ज्या स्वरांचा त्यामध्ये उल्लेख आहे त्याच स्वरापासून गाण्याचं कडवं सुरू होतं. उदाहरणार्थ ‘षड्जपंचमाची कानी कुंडले डुलावी’ हा अंतरा बरोबर तारषड्जातून सुरू होतो तोच ‘तुझ्या भाळी गंधाराचे गंध रेखवावे’ ही दुसरी ओळ अतिशय मोहक वेलांटी घेत थेट गंधारावर येते आणि तीच स्वरलहर तिसऱया
‘रिषभ चंदनाची तुजला उटी माखवावी’ या ओळीत रिषभावर इतक्मया अलगदपणे येऊन विसावते की जणुकाही एखाद्या पक्ष्यानेच डौलदार भरारी संपवून तारेवर विसावावे. तर दुसऱया कडव्यात
‘मधुर मध्यमाचे तुजला वस्त्र नेसवीतो
शाल धैवताची तुजला पांघरून देतो
अलंकार आलापांनी वक्ष भूषवीतो
भक्तिच्या फुलांची माला घालितो गळय़ात’ या शब्दांत क्रमेण त्या त्या स्वरांच्या उल्लेखाबरोबर ते ते स्वर गाण्यात येतात. श्रीकृष्ण चंद्रात्रे यांनी रचलेलं हे गीत अद्वितीय झालं आहे ते या अशाच वैशिष्टय़ांमुळे. अशा या गीताला यथायोग्य न्याय दिलाय तो संगीतकार राम उगावकर यांच्या समर्पक स्वरसाजाने! सप्तसुरांची उधळण सप्तरंगांचीही उधळण करते. आणि सातही स्वर्ग धरेवर उतरून आणते. मग गीत म्हणून साक्षात पांडुरंग आले तर त्यात नवल ते काय?
या आणि अशा गीतांतून सूचित हेच होतं की देवाची मूर्ती सजवण्यासाठी फुलं किंवा दागिनेच हवेत असं थोडंच आहे? ती सुरांनीही सजवता येते. गाण्यातले अलंकार आलापही देवाला वाहता येतात. शेवटी त्यानेच दिलेले त्यालाच तर समर्पित करायचे असते. मग कलाकारांसाठी आपली कलाच तर सर्वोपरी असते. तीच वहायची, तिनेच पूजा भक्ती करायची. ओंकार अनादि अनंत असलेल्या त्या गणेशाची आराधना करण्यासाठी हा सुरेल मार्ग आहे. म्हणून त्या गणेशाचे लाड पुरवण्यासाठी धावाधाव करणारे पाय आणि सजावट करणारे हात जेव्हा पावलांमध्ये तत्कार बांधून आणि कंठात स्वर भरून घेऊन जेव्हा त्या बाप्पासमोर लीन होतात तेव्हा म्हणावंसं वाटतं.
तूच सूर ठावा मजसी तूच एकतारी
सगुण रूप दावी देवा एकदा तरी.
– अपर्णा परांजपे-प्रभु