प्रतिनिधी / बार्शी
बार्शी शहरांमध्ये आणि तालुक्यात कोरोना या विषाणूंचा प्रादुर्भाव रोजच्या रोज वाढत असताना बार्शी शहर पूर्णपणे बंद करण्याचे किंवा इतर उपाय योजना काय आणि कशा राबवायच्या यासाठी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या उपस्थितीत बार्शीतील लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांच्यात झालेल्या बैठकीत बार्शी शहरात तूर्त तरी लॉकडाऊन करू नये असा निर्णय घेण्यात आला. मात्र असा निर्णय झाला असला तरी येत्या चार-पाच दिवसात नागरिकांनी नियम पाळले नाही तर मात्र कडक लॉकडाऊन करण्यात येणार असल्याचेही पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी यावेळी सांगितले.
बार्शी येथील श्री शिवाजी महाविद्यालय येथे ही बैठक पार पडली या बैठकीस आमदार राजेंद्र राऊत माजी मंत्री व माजी आमदार दिलीप सोपल, नगराध्यक्ष असिफ तांबोळी, बार्शी नगरपरिषद विरोधीपक्षनेते नागेश अक्कलकोटे, बार्शी पोलीस निरीक्षक संतोष गिरी गोसावी पोलिस उपअधीक्षक डॉक्टर सिद्धेश्वर भोरे, बार्शी तहसीलदार प्रदीप शेलार , गटविकास अधिकारी शेखर सावंत, तालुका आरोग्य अधिकारी संतोष जोगदंड ,बार्शी तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे ,यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
यावेळी अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांच्यामध्ये चर्चा झाली आणि बार्शी तूर्त तरी लॉकडाऊन करायचा नाही असे ठरवले गेले. यावेळी आपली भूमिका मांडत असताना आमदार राजेंद्र राऊत यांनी पोलिसांवर ताशेरे ओढले लॉक डाऊन झाला तर पोलीस कठोर भूमिका घेतात नागरिकांना मारतात तर माजी आमदार दिलीप सोपल यांनी आपली भूमिका मांडताना सांगितले की बार्शी शहरांमध्ये डेडिकेटेड हॉस्पिटल नको आहे, मी पूर्वी सूचना केली होती की शहराच्या बाहेर औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहे.
तेथे पाच हजार स्क्वेअर फुटाचे मोठे हॉल आहेत त्यामुळे त्याठिकाणी हॉस्पिटल उभारण्यात यावे. तसेच माजी आमदार सोपल यांनी यावेळी तहसीलदार प्रदीप शेलार यांना सुनावले की आपण तालुक्याचे प्रमुख आहात आणि आपणच घाबरून घरात बसणे योग्य नाही , जरा कामात गती आणा जेणेकरून नागरिक घाबरनार नाहीत आणि कोरोणा रुग्ण संख्या वाढणार नाही. यावेळी नगराध्यक्ष असिफ तांबोळी यांनी आपली भूमिका मांडताना सांगितले की बार्शीकर नागरिक रोज फोन किंवा मेसेज दोरे मला विनंती करत आहेत की बार्शी शहरात किमान सात ते आठ दिवसाचा लॉकडाऊन जाहीर करा तसेच यावेळी विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे यांनी आपली भूमिका सांगताना सांगितले की, बार्शी नगरपरिषद उपाययोजना करण्याच्या कामात कमी पडत आहे तसेच प्रतिबंधित केलेल्या क्षेत्रांमध्ये पुरेशी काळजी घेतली जात नाही. आरोग्याविषयी काळजी घेतली जात नाही , दवाखान्यातील कर्मचारी सफाई कर्मचारी आणि नगर परिषदेचे सफाई कर्मचारी यांना पुरेशी सुरक्षा साधने दिली जात नाहीत त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका असून तात्काळ याबाबत उपाययोजना करणे गरजेचे आहे.
या सर्व भूमिका ऐकल्यानंतर पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी बोलताना विशद केले की बार्शी शहरांमध्ये रुग्ण संख्या वाढण्याचे कारण म्हणजे घरामध्ये अलगीकरण केलेली लोक बाहेर फिरतात आणि संस्थात्मक विलगीकरण किंवा प्रतिबंधित क्षेत्रात लोक बाहेर फिरतात त्यामुळे संसर्ग वाढत आहे आणि एखादा रुग्ण पॉझिटिव्ह निघाल्यानंतर त्याच्या संपर्कातील व्यक्तीचा शोध घेऊन तात्काळ त्यांना विलगिकरण करणे गरजेचे असताना ते घडत नाही, तसेच कोणाचा एखाद्या रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आणि त्याचा राहण्याचा विभाग हा प्रतिबंधित केला जातो मात्र हे प्रतिबंधित करण्यासाठी खूप वेळ लावला जातो.
हे योग्य नाही तसेच प्रतिबंधित क्षेत्र करत असताना तात्काळ अर्ध्या ते एक तासाच्या आत प्रतींबांधीत क्षेत्र केले केले जावे. छोट्या भागाचे न करता मोठे क्षेत्र प्रतिबंधित करावे अशी सूचना केली , तसेच त्यांनी नागरिकांना आवाहन केले की येथून पुढे पोलीस कठोर भूमिका घेणार आहेत गाडीवरून डबलसीट जाणे गर्दी करणे , प्रकार टाळावेत नाहीतर गुन्हे दाखल करण्यात येतील. या बैठकीचे संचालन पोलीस उप अधीक्षक डॉक्टर सिद्धेश्वर मोरे यांनी केले.