बुद्धी म्हणजे वस्तू, व्यक्ती, प्रसंग व माहिती समजून घेण्याची, लक्षात ठेवण्याची क्षमता, तसेच काय चांगले व काय वाईट, हे ठरविण्याची क्षमता होय. आयुष्यातल्या वेगवेगळय़ा टप्यांवर योग्य कृती कोणती, याचा निर्णय घेण्यासाठी प्रखर बुद्धीची गरज असते. आपल्याला अनंत समस्यांना, ताणतणावांना तोंड द्यावे लागते. आव्हानांवर स्वार होऊन त्यांच्यावर विजय मिळवण्यासाठी लागणारी बुद्धी केवळ मनुष्यमात्राला आहे, हे लक्षात ठेवा.
बाकी सर्व जीवचर बुद्धीअभावी बाह्य परिस्थितीचे शिकार असतात. प्रखर बुद्धिमत्ता या बाह्य प्रतिकूलतेचा सामना करू शकते, त्यातून मार्ग काढू शकते. अर्थात मानवी बुद्धीचं कार्य इथेच संपत नाही. भौतिक जगाच्या पलीकडे जाऊन आत्मीक उन्नती गाठण्याची अलौकिक क्षमताही बुद्धीकडे आहे.
अशा बुद्धीचं संवर्धन करण्यात अनभिज्ञ असलेले आपण केवळ दुसऱ्यांच लेखन वाचण्यात रममाण होतो. आपण फक्त किती वाचलं यावर भर देतो. पानंच्या पानं वाचत सुटतो, परंतु त्याचे आपल्यावर किती व कोणते खोल पारिणाम होताहेत, याकडे मात्र आपलं लक्ष नसतं.
मुळापर्यंत जाऊन अभ्यास करणार्यांची संख्या थोडी असते हेच खरं! त्यामुळे वाचलेल्यांपैकी फारच थोडं वाचकांकडून पचवलं जातं. लोक अनेक पिढ्यांपासून अभ्यास करत आहेत, आणि संपूर्ण आयुष्याचा प्रवास त्याचा अर्थ आणि कारण जाणल्याखेरीजच करत आहेत. त्यामुळे जगात एकाच दिशेने विकास झालेल्या व्यक्तिमत्त्वाचा भरणा झालेला आहे. जिथं हुशारी आहे पण बुद्धी नाही, इंटेलिजन्स आहे पण इंटलेक्ट नाही. यासाठी शास्त्रज्ञ असलेल्या परंतु दारूच्या आहारी गेलेल्या व्यक्तीचं उदाहरण बघा ना. त्याच्या लिव्हरवर पाfरणाम झालेला आहे, तो अत्यंत शीघ्रकोपी स्वभावाचा आहे आणि त्याचा रक्तदाब प्रचंड वाढला आहे. त्यात तो तणावग्रस्त असून जगातली छोटी छोटी आव्हाने पेलण्यासहि तो अकार्यक्षम आहे. या व्यक्तिमत्त्वाची नीट चिकित्सा करा, म्हणजे हुशारी आणि बुद्धीतला फरक लक्षात येईल. आपल्या विषयाचं गाढं ज्ञान असलेला तो नामवंत शास्त्रज्ञ आहे. प्रचंड हुशारी त्यानं मिळवली आहे, परंतु बुद्धीचा विकास करण्याचे कष्ट मात्र त्याने घेतलेले नाहीत.
त्याची बुद्धी हि नेहमीच तकलादू राहिलेली आहे. अनेक छटा असलेल्या बहुविध मागण्या हाताळण्याचं सामर्थ्य त्याच्याकडे नाहीये. त्याचं मन दारूसाठी आक्रंदतं, सतत दारूची मागणी करणार्या मनावर ताबा ठेवण्याइतकी त्याची बुद्धी सामर्थ्यशाली नाहीये. त्यामुळे ज्या वेळी त्याच्या मनावर समस्यांमुळे ताण पडतो, ते भंडावून जातं, त्याला पाfरस्थितीशी जुळवून घेता येत नाही. त्या वेळी त्याची हुशारी निष्प्रभ ठरते. या उलट काहि स्वयंप्रकाशी व्यक्ती प्रगाढ बुद्धिमान असतात, ज्यामुळे त्या स्वत:च्या मनावर पूर्ण ताबा ठेवतात. त्यांच्यापैकी काहींकडे तर लौकिक शिक्षणाचाहि अभाव असतो, परंतु त्यांच्या भोवताली संस्था उभ्या राहतात. बुद्धीचा विकास केला तरच आपण स्व-नाशापासून स्वत:ला वाचवू शकू आणि आत्मिक पूर्णावस्थेमध्ये उत्क्रांत होऊ शकू.