मिथुन चक्रवर्ती यांचा मोठा दावा ः पश्चिम बंगालमध्ये खळबळ
वृत्तसंस्था / कोलकाता
भाजप नेते मिथुन चक्रवर्ती यांच्या विधानामुळे पश्चिम बंगालच्या राजकारणात नव्याने खळबळ उडाली आहे. पश्चिम बंगालमध्ये महाराष्ट्राप्रमाणे सत्तापरिवर्तन होण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचे 38 आमदार भाजपच्या संपर्कात आहोत. यातील 21 आमदार थेट आपल्या संपर्कात असल्याचा दावा चक्रवर्ती यांनी केला आहे. भाजप आमदारांसोबत झालेल्या बैठकीनंतर त्यांनी हे विधान केले आहे. राज्यात 2021 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत बळजबरीने विजय मिळविल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
चित्रपटापूर्वी संगीत आणि मग ट्रेलर प्रदर्शित होत असतो. पश्चिम बंगालच्या राजकारणात आता संगीत प्रदर्शित झाले असून ट्रेलरची प्रतीक्षा करा, असे मिथुन यांनी फिल्मी स्टाइलमध्ये विधान केले आहे. मिथुन चक्रवर्ती हे मागील वर्षी भाजपमध्ये सामील झाले होते.
भाजपला मुस्लीमविरोधी ठरविणे हा राजकीय कट आहे. भाजप दंगली घडवत असल्याचा आरोप नेहमी होत असतो. परंतु हा केवळ कटाचा भाग असल्याचे स्पष्ट करू इच्छितो. भाजपचे 18 राज्यांमध्ये सरकार आहे. भाजप जर मुस्लिमांचा द्वेष करत असता तर सलमान खान, शाहरुख खान आणि आमिर खान हे स्टारचे चित्रपट या राज्यांमधून मोठा गल्ला कमवू शकले नव्हते. हिंदू, मुस्लीम, शीख सर्वजण प्रेम करत असल्यानेच मी इथवर पोहोचू शकलो, असे उद्गार मिथून यांनी काढले आहेत.
ईडीच्या कारवाईप्रकरणी बोलताना मिथुन यांनी जर गुन्हा केला नसेल तर घाबरण्याची गरज नाही, परंतु एखाद्याने गुन्हा केला असल्यास त्याला कुठलीच शक्ती वाचवू शकत नसल्याचे मिथुन यांनी म्हटले आहे.
ममता बॅनर्जी सरकारमधील मंत्री पार्थ चॅटर्जी यांना ईडीने अटक केली आहे. चॅटर्जी यांची निकटवर्तीय अभिनेत्री अर्पिता मुखर्जीलाही अटक करण्यात आली आहे. अर्पिताच्या निवासस्थानातून 20 कोटी रुपयांची रोख रक्कम हस्तगत करण्यात आली होती. ही रक्कम शिक्षक भरती घोटाळय़ाशी संबंधित असल्याचे ईडीचे म्हणणे आहे.
पार्थ चॅटर्जी यांच्याबद्दल तृणमूल काँग्रेसला निर्णय घ्यायचा आहे. राजकारणात मी आता अधिक सक्रीय असून भाजपसाठी काम करत आहे. राज्यसभेवर न जाता आता मी बंगालची सेवा करणार असल्याचे मिथून यांनी म्हटले आहे.
तृणमूल काँग्रेस निवडणुकांमध्ये फेरफार तसेच गुंडगिरी करत असल्याचा आरोप चक्रवर्ती यांनी केला आहे. पश्चिम बंगालची जनता तृणमूल काँग्रेस आणि ममता बॅनर्जी यांच्यावर प्रेम करत असल्यास मतदारांना धमक्या का दिल्या जातात? निष्पक्ष निवडणूक झाल्यास राज्यात भाजप सत्तेवर येणार आहे, असे विधान त्यांनी केले आहे.
मिथुन यांच्या राजकीय विधानावर तृणमूल काँग्रेसने प्रतिक्रिया दिली आहे. मिथुन काही दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल झाले होते. त्यांना बहुधा मानसिक आजार असावा, राजकारण त्यांना समजत नाही, हीच खरी अडचण असल्याचे तृणमूल काँग्रेसने म्हटले आहे.