कोलकाता
तृणमूल काँगेसचे 41 आमदार भाजपमध्ये येण्याच्या तयारीत आहेत, असे विधान करून पश्चिम बंगालचे भाजप प्रभारी कैलास विजयवर्गिय यांनी खळबळ उडवून दिली आहे. या 41 आमदारांची सूची तयार असून केव्हाही राज्यात भूकंप होऊ शकतो, असे त्यांचे म्हणणे आहे. राज्यात विधानसभा निवडणूक आता चार महिन्यांवर आली असून दोन्ही पक्षांमध्ये चुरशीचा संग्राम अपेक्षित आहे. गेल्या तीन आठवडय़ांमध्ये तृणमूल काँगेसचे 11 आमदार भाजपमध्ये आले आहेत. आणखी 41 आमदार पक्षात आल्यास ममता बॅनर्जी यांचे बहुमत धोक्यात येण्याची शक्यता आहे, असेही प्रतिपादन विजयवर्गिय यांनी केले. सध्या राज्यातील सर्वच पक्षांमधून भाजपमध्ये कार्यकर्त्यांचा ओघ सुरू असून निवडणूक जवळ येईल तसा पक्षांतरालाही वेग येण्याची शक्यता आहे, असे बोलले जाते.
तृणमूलचे प्रतिपादन
भाजपचे राज्यातील सहा ते सात खासदार तृणमूलमध्ये येण्यास तयार आहेत, असे विधान दोन दिवसांपूर्वी तृणमूल काँगेसच्या पदाधिकाऱयांनी केले होते. ते भाजपने लगोलग नाकारले होते. त्या खासदारांची नावे सांगा असा आग्रह त्यांनी तृणमूलकडे धरला होता. यापुढच्या काळात दोन्ही पक्षांमध्ये असेच शब्दयुद्ध रंगणार असून राजकीय आरोप-प्रत्यारोप होत राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे.