आमदार चर्चिल आलेमाव यांनी दिलेली माहिती : मात्र राष्ट्रवादीचा विश्वासघात करणार नाही
प्रतिनिधी /मडगाव
तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी आपल्याशी संपर्क साधला आहे. मात्र आपण राष्ट्रवादी पक्ष तसेच पक्षाचे वरिष्ट नेते सर्वेसर्वा शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांचा विश्वासघात करणार नाही, असे राष्ट्रवादीचे बाणावलीचे आमदार चर्चिल आलेमाव यांनी म्हटले आहे. तृणमूल काँग्रेसचे नेते विविध पक्षांतील नेत्यांशी संपर्क साधत आहेत तसेच त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. त्यांच्या नेत्यांनी आपल्याशी संपर्क साधला आहे काय अशी पत्रकारांनी विचारणा केली असता आलेमाव यांनी वरील प्रतिक्रिया दिली.
आमदार आलेमाव यांनी आम्ही युतीसाठी 15 दिवस देत आहोत, असे पंधरवडय़ापूर्वी स्पष्ट केले होते. त्यासंदर्भात अधिक माहिती देण्यासाठी त्यांनी वार्का येथील कार्यालयात पत्रकार परिषद बोलाविली होती. युतीसाठी दिलेली 15 दिवसांची मुदत संपली आहे. मात्र नुकतीच राज्यातील आमचे प्रदेशाध्यक्ष जुझे फिलीप डिसोझा व अन्य काहींनी वरिष्ट नेते पवार व पटेल यांची भेट घेतली असता त्यांनी युतीसंदर्भात अजूनही बोलणी चालू असल्याचे सांगितले आहे, असे आलेमाव यांनी नजरेस आणून दिले.
युती झाली नाही, तर आपणास फरक पडत नाही. बाणावलीची जनता आपल्यामागे आहे, याचा त्यांनी पुनरुच्चार केला. मात्र लोकांची भावना समविचारी पक्षांनी एकत्र येऊन भाजपाचा पाडाव करावा अशी आहे. त्यासाठी युतीची गरज असल्याचा दावा आलेमाव यांनी केला.
लुईझिन फालेरो काँग्रेसमध्ये दुखावलेत
नावेलीचे आमदार लुईझिन फालेरो यांची तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांकडून भेटी घेतल्या जात आहेत याकडे लक्ष वेधले असता, आपणास फालेरो काँग्रेसमध्ये दुखावले गेले असल्याचे दिसून येते, त्यामुळे काहीही होऊ शकते, असे उद्गार आलेमाव यांनी काढले. 1999 मध्ये काँग्रेसला 21 जागांवर विजय मिळवून दिल्यानंतर 2017 मध्ये 17 जागा मिळवून दिल्या, तरी फालेरो यांच्याकडे दुर्लक्ष झाले. 2017 साली काँग्रेस, राष्ट्रवादी व अन्य मिळून सरकार स्थापन करणे जवळपास निश्चित झाले होते. आपण दोन आमदारांची व आपली सही असलेले पत्र तत्कालीन काँग्रेस निरीक्षक दिग्विजय सिंह यांच्याकडे सुपूर्द केले होते. पण त्यांनी ते राज्यपालांना सादर केले नाही. यातून अन्य राजकीय घडामोडी घडल्या व काँग्रेस पक्ष सरकार बनवू शकला नाही, असा दावा त्यांनी केला. आपण भाजप सरकारला विकासकामांसाठी बाहेरून पाठिंबा देत असलो, तरी त्यासंदर्भात कोणतेही लेखी पत्र दिलेले नाही, असे आलेमाव यांनी यावेळी सांगितले.