केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे मिशन बंगाल : राज्यात परिवर्तन घडणार
वृत्तसंस्था / कोलकाता
भाजपची परिवर्तन यात्रा बंगालच्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघात जाणार असून ममता बॅनर्जी सरकारला सत्तेवरून पायउतार करायचे आहे. तृणमूल काँग्रेसचे सिंडिकेटवाले केंद्र सरकारकडून मिळणारे लाभ जनतेपर्यंत पोहोचू देत नाहीत. आमची लढाई याच सिंडिकेटशी आहे. आमचे लक्ष्य ममतांचे सरकार हटवून आमचे सरकार आणणे नसून बंगालच्या गरीब जनतेत परिवर्तन करणे असल्याचे उद्गार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुरुवारी काढले आहेत.
शेतकऱयांच्या पिकाचा योग्य भाव दलालांना नव्हे तर शेतकऱयांना मिळावा, याला परिवर्तन म्हणतात. राज्यातील जनतेला सण चांगल्याप्रकारे साजरे करता यावेत. मच्छिमार, जंगलात राहणाऱयांची स्थिती बदलणे याला परिवर्तन म्हणावे. ममतांच्या शासनकाळात जनता सुरक्षित राहू शकते? बंगाल विकासाच्या मार्गावर जाऊ शकतो का? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लागू केलेल्या योजना ममतादीदी जनतेपर्यंत पोहोचू देत नसल्याचा आरोप शाह यांनी केला आहे.
केवळ भाच्याला प्रोत्साहन
ममता दीदींचे सिंडिकेट गरीबांच्या थाळीतील अन्न हिसकावून घेत आहे. ममतांनी सुंदरबन जिल्हा निर्माण करणार असल्याचे म्हटले होते, पण अद्याप याची अंमलबजावणी झालेली नाही. मोदी सरकारने दिलेला पैसा तृणमूलच्या गुंडांनी हडप केला. तृणमूल काँग्रेसचा एकच नारा असून तो ‘भाच्याला पुढे करणे’ हा असल्याची टीका शाह यांनी केली आहे.
दुर्गा पुजेवर बंदी का?
बंगालमध्ये दुर्गा पूजा होऊ नये का? दुर्गा पुजेसाठी न्यायालयाची अनुमती घ्यावी लागते. ममतादीदींनी सरस्वती पुजेवरही बंदी घातली आहे. केवळ भाजपच्या दबावामुळे ममतादीदी सरस्वती पूजा करताना दिसून आल्या. पण ममतांनी शाळांमध्ये या पूजेवर बंदी घातल्याचे बंगालच्या जनतेला ज्ञात असल्याचे शाह म्हणाले.
तृणमूल गुंडांचा पक्ष
बंगालमध्ये आमचे अनेक कार्यकर्ते मारले गेले. ममतादीदी, तृणमूलने आमच्या 130 कार्यकर्त्यांचा जीव घेतला. या कार्यकर्त्यांचे हौतात्म्य व्यर्थ जाणार नाही. भाजप सत्तेवर आल्यावर या सर्व गुंडांना हुडकून काढून शिक्षा करण्यात येणार आहे. निवडणुकीच्या दिवशी तृणमूलचा एकही गुंड रस्त्यावर दिसून येणार नसल्याने निर्धास्तपणे मतदान करा असे शाह यांनी उपस्थित जनसमुदायाला उद्देशून म्हटले आहे.
सोनार बांग्लाची घोषणा
राज्यात जय श्रीराम असा नारा दिल्यास ममतादीदींना राग येतो. हा नारा दिल्याने कुणाचे काय नुकसना होते? जय श्रीरामचा नारा आम्ही घराघरापर्यंत पोहोचविणार आहोत. मोदींना सोनार बांग्ला निर्मितीची संधी द्या असे विधान शाह यांनी केले आहे.
22 फेब्रुवारी रोजी मोदींची सभा पश्चिम बंगालमध्ये विजय मिळविण्यासाठी भाजपने पूर्ण शक्ती पणाला लावली आहे. अमित शाह यांच्यानंतर 22 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हुगळीत एका सभेला संबोधित करणार आहेत.