पंतप्रधान मोदींनी केले लक्ष्य- तृणमूल नेत्याने भिकारी संबोधिल्याचा आरोप
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बंगालच्या वर्धमानमध्ये प्रचारसभेला संबोधित केले आहे. या सभेत त्यांनी तृणमूल नेत्याकडून अनुसूचित जातीचा अपमान करण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. बंगालच्या जनतेबद्दलचा ममतादीदींचा द्वेष वाढत चालला आहे. दीदींचे लोक आता अनुसूचित जातींच्या लोकांना शिव्या देऊ लागले आहेत. त्यांना भिकारी ठरवू लागले आहेत. तृणमूल काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला असल्याचा आरोप मोदींनी केला आहे.
तृणमूल काँग्रेसच्या नेत्या सुजाता मंडल यांनी अनुसूचित जातीच्या लोकांना भिकारी संबोधिले होते. अनुसूचित जातीचे लोक स्वभावाने भिकारी असतात असे अत्यंत आक्षेपार्ह उद्गार आरामबाग मतदारसंघातील तृणमूल काँग्रेसच्या उमेदवार सुजाता मंडल यांनी काढले होते. बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी अनुसूचित जातींसाठी बरेच काही केले, पण तरीही काही पैशांसाठी ते भाजपला साथ देत असल्याचा दावा मंडल यांनी केला आहे.
दीदींच्या सहमतीनंतरच विधान
अनुसूचित जातींच्या माझ्या बंधूभगिनींच्या विरोधात इतके गलिच्छ विधान ममतादीदींच्या सहमतीशिवाय कुणी कसे करू शकते? आमच्या दलित समाजाच्या लोकांना शिव्या वाहण्यात आल्या तरीही ममतादीदींनी अद्याप माफी मागितलेली नाही. भारतातील अनेक पक्ष दीदींसोबत उभे राहतात, पण कुणीच दलितांच्या अपमानाच्या विरोधात चकार शब्दही काढला नसल्याचे मोदींनी म्हटले आहे.
दलितांचा अपमान घोडचूक
दीदी…ओ दीदी, तुम्हाला आणि तुमच्या सहकाऱयांना नेमकं काय झालंय? भाजपला मतदान करणाऱयांना उचलून बाहेर फेकू असे तृणमूलचे नेते म्हणत आहेत. दलितांचा अपमान करणे ही तृणमूल काँग्रेसची सर्वात मोठी चूक आहे. तृणमूलच्या नेत्यांना शिव्या द्यायच्या असतील तर मोदीला द्या. पण बंगालच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवू नका. बंगाल आता कटमनी, खंडणीबाजी आणि सिंडिकेट सहन करणार नसल्याचे उद्गार मोदींनी काढले आहेत.
मॉब लिंचिंगचा उल्लेख
बंगालमध्ये झालेल्या बिहारच्या पोलीस अधिकाऱयाच्या मॉब लिंचिंगचाही मोदींनी उल्लेख केला आहे. एक वीर जवान दोन दिवसांपूर्वी स्वतःच्या कर्तव्याचे पालन करण्यासाठी बंगालच्या भूमीवर आला होता. पण बंगालमध्ये त्या पोलीस अधिकाऱयाची हत्या करण्यात आली. एका आईने स्वतःच्या वीरपुत्राचे पार्थिव पाहिल्यावर अखेरचा श्वास घेतला. ममतादीदींच्या धोरणंमुळे कितीतरी मातांकडून त्यांचे पुत्र हिरावले गेले आहेत. कूचबिहारमध्ये 2 दिवसांपूर्वी मृत्युमुखीड पडलेले लोक देखील कुठल्या तरी मातेचे पुत्र होते. ममतादीदी इतक्या निर्घृण आहेत, याचा अंदाज बंगालच्या कुठल्याच मातेला नव्हता असे म्हणत मोदींनी तृणमूल काँग्रेसला लक्ष्य केले आहे.
ममतादीदी क्लीनबोल्ड
बंगालच्या जनतेने तृणमूल काँग्रेसला क्लीनबोल्ड केले आहे. येथील जनतेने अनेक चौकार-षटकार लगावल्याने 4 टप्प्यांच्या निवडणुकीमध्येच भाजपची ‘सेंच्युरी’ झाली आहे. ममतादीदींनी 10 वर्षांपर्यंत मां, माटी आणि मानुषच्या नावाखाली शासन केले. या 10 वर्षांमध्ये बंगालच्या लोकांनी सहन केलेल्या त्रासाची चर्चाच होत नाही. ममतादीदींनी बंगालमध्ये मोठी गडबड केली आहे. ममतादीदींच्या सहकाऱयांनी गरीबांना लुटून स्वतःचे बंगले उभे केल्याचा आरोप मोदींनी केला आहे.
ममतांमधील कटूता वाढतेय
ममतादीदींना वर्धमानमधील मिहिदाना (मिठाई) पसंत नाही का? इतकी कटूता ममतादीदी कुठून आणतात असा प्रश्न मला पडल आहे. त्यांच्यामधील कटूता, राग, त्यांची अस्वस्थता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. ममतादीदी जनतेसोबत ‘खेला’ करू पाहत होत्या. पण त्यांच्यासोबतच ‘खेला’ झाला असल्याची खोचक टीका पंतप्रधानांनी केली आहे.