केलकाता / वृत्तसंस्था
13 वर्षांपूर्वी पश्चिम बंगालच्या सिंगूरमधून टाटा मोटर्स या कंपनीला घालवून दिलेल्या ममता बॅनर्जी यांनी आता पुन्हा त्याच रतन टाटांना राज्यात गुंतवणूक करण्यासाठी साकडे घातले आहे. बॅनर्जी यांचे मंत्री पार्था चॅटर्जी यांनी टाटांशी चर्चा सुरू असल्याचे स्पष्ट केले. 13 वर्षांपूर्वी जे घडले त्यात टाटांचा दोष नव्हता. तसेच आमची टाटांसंबंधी कोणतीही नाराजी नाही, असे वक्तव्य त्यांनी केले.
रोजगार निर्मिती ही आमची प्राथमिकता आहे. यासाठी मोठय़ा कंपन्यांना सवलती देण्याची तयारी आहे. सवलतींचे प्रमाण किती रोजगारनिर्मिती या कंपन्या करतात यावर अवलंबून आहे. राज्यात लवकरात लवकर दोन मोठी उत्पादन केंद्रे सुरू करण्याचे धोरण आहे. सिंगूरला जे घडले ते परिस्थितीमुळे घडले. परिणामी, टाटांना आपला प्रकल्प गुंडाळावा लागला, अशी सारवासारवी चॅटर्जी यांनी केली.
खापर डाव्यांवर
सिंगूर प्रकरण घडले तेव्हा राज्यात डाव्यांची सत्ता होती. त्यांनी सक्तीने जमीन ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आंदोलन करावे लागले, असे स्पष्ट करत त्यांनी डाव्यांवरच त्या वेळच्या घटनांचे खापर फोडले. यामुळे डावे विरुद्ध तृणमूल असा नवा वाद राज्यात सुरू होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.