‘गोंयचो आवाज’चा दावा
प्रतिनिधी /मडगाव
गोव्यात तृणमूल काँग्रेस येण्यामागे मडगाव परिसरातील एका रिंगमास्टरचा हात असल्याचा दावा ‘गोंयचो आवाज’ या पक्षाने मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. हा रिंगमास्टर अशा गोष्टी करण्यासाठी प्रसिद्ध असून या पूर्वी देखील त्याने असे प्रकार केल्याची माहिती देण्यात आली. या रिंगमास्टरचे नाव काय असा सवाल पत्रकारांनी केला असता, योग्यवेळी आम्ही त्याचे उत्तर देऊ असे कॅप्टन विरिएतो फर्नांडिस म्हणाले.
गोव्यात भाजप विरोधी लढय़ाची गरज असताना तृणमूल काँग्रेसला आणून मत विभागणी करून त्यांचा लाभ भाजपला मिळवून देण्यासाठी हा रिंगमास्टर प्रयत्न करीत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. तृणमूल काँग्रेसला गोव्यात आणून एक नवीन राजकीय सर्कस सुरू करण्यात आलेली आहे. त्यामुळे गोमंतकीयांनी सतर्क आणि एकत्र राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. आता जे राजकारणी स्वतःला गोव्याच्या विनाश आणि विध्वंसात मुख्य भागीदार बनवीत आहेत, त्यांच्या पासून सावध राहण्याचा सल्ला पक्षाने दिला आहे.
सध्य परिस्थितीवर भाष्य करताना, गोंयचो आवाज पक्षाचे राज्य संयोजक कॅप्टन विरिएतो फर्नांडिस म्हणाले, की लुईझिन फालेरो यांनी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि नावेलीचे आमदार म्हणून अचानक राजीनामा दिला. राजीनामा देण्याचे कारण, ‘विभाजन करण्याचा प्रयत्न करणाऱया लोकांशी लढण्यासाठी आणि आपल्या राज्याच्या एकीकरणासाठी’ असल्याचे सांगून फालेरो यांनी गोमंतकीयांच्या बुद्धिमत्तेचा अपमान करू नये.
लुईझिन फालेरो यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा जाहीर करताना सांगितलेली गूढ आणि अस्पष्ट कथा, कुणालाच मूर्ख बनवू शकली नाही. मार्च 2017 मध्ये काँग्रेसला सरकार स्थापनेचा दावा सादर करण्यासाठी राज्यपालांना पत्र सादर करण्यापासून दिग्वजिय सिंह यांनी आपल्याला रोखले, असा संतापजनक दावा फालेरो यांनी केला, त्यावेळी फालेरो काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष नव्हते का ? असा सवाल ही त्यांनी उपस्थितीत केला.
आम्ही श्री. फालेरो यांना विचारू इच्छितो, की जेव्हा भाजप सरकार प्रादेशिक आराखडा, रेल्वे दुपदरीकरण, तीन प्रस्थापित प्रकल्प आणून गोवा विकुन नष्ट करत होते, तेव्हा फालेरो यांचा मान कुठे गेला होता ? की, त्याना फक्त मोजक्मयाच गोष्टींवर केलेला अपमान लागतो ? त्यांच्या 10 आमदारांनी काँग्रेस पक्षाचा विश्वासघात केला आणि लोकांच्या जनादेशाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले, तेव्हा त्याचा अपमान कुठे होता ? लुईझिन फालेरो यांनी गोव्यातील लोकांसमोर स्पष्ट केले पाहिजे, की त्यांनी काँग्रेसमधून बाहेर पडताना 10 पक्षभ्रष्ट आमदारांना वचन दिले होते का, की ते योग्य वेळी पक्षाबाहेर सुरक्षित मार्ग काढतील ?
गोंयचो आवाज पक्षाचे अध्यक्ष स्वप्नेश शेर्लेकर म्हणाले, गोव्याच्या राजकीय वर्तुळात राजकारणाचा व्यवसाय मोठय़ा प्रमाणावर सुरू आहे, जिथे दुर्दैवाने, मातीतील गोंयकार स्वतःच मातृभूमीचा विश्वासघात करत आहेत आणि त्यांच्या स्वार्थासाठी गोवा विकत आहेत. लोकांसाठी हे स्पष्ट आवाहन आहे, की आपण एकत्रितपणे याविरुद्ध लढूया आणि गोवा वाचवू या. तृणमूल काँग्रेसने हे समजले पाहिजे, की लोकांच्या हिताच्या दृष्टीने काम न करणारा कोणताच भयंकर राजकीय अजेंडा, त्यांना पुढे नेण्यासाठी गोव्याचा उपयोग प्यादा म्हणून करू देणार नाही. गोवा स्वतःच्या समस्यांची काळजी घेण्यासाठी समर्थ आहे.
उपाध्यक्ष रोशन मथायस म्हणाले, की इतिहासाने आपल्याला वारंवार शिकवले आहे, की पोर्तुगीज आणि ब्रिटीशांचा भारतातील प्रवेश, स्थानिक गद्दारामुळेच सुलभ झाला होता. लुईझिन फालेरो याना स्वतःबद्दल हाच वारसा मागे सोडायचा आहे का, की तृणमूल काँग्रेसला मदत करुन आपल्याच मातृभूमीच्या विनाशात ते भागीदार व जबाबदार झाले ? या विश्वासघातासाठी गोव्याचे लोक लुईझिन याना कधीही क्षमा करणार नाहीत.
कॅप्टन विरिएतो फर्नांडिस शेवटी म्हणाले, की माझ्या सहकारी गोमंतकीयांसाठी माझा एक संदेश आहे. आता एकत्र येण्याची आणि एकत्र राहण्याची वेळ आली आहे. आमचा लाडका गोवा नष्ट करण्याची धमकी देणाऱया शक्तींशी आपण एकत्र दोन हात लढू. याआधी एकदा मुक्ती मिळवण्यात गोमंतकीयांना यश आले आहे आणि आम्ही ते पुन्हा करून दाखवू.