तसे पाहता तृणमूल काँग्रेसने या पूर्वी गोव्यात आपले पाय ठेवले होते. मात्र, येथील मतदारांनी त्यांना साथ दिली नव्हती. त्यामुळे त्यांना माघार घ्यावी लागली होती. आज तृणमूल काँग्रेस पुन्हा एकदा गोव्यात सक्रीय होऊ पहात आहे. मुळात तृणमूल काँग्रेसचे कोणतेच कार्य या ठिकाणी नव्हते. अशा वेळी नव्याने या पक्षाला सुरवात करावी लागणार आहे.
बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने भाजपला धुळ चारल्याने तृणमूल काँग्रेसची सर्वांना दखल घ्यावी लागली. बंगालची निवडणूक भाजपने प्रतिष्ठेची बनविली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बंगालमध्ये प्रचाराला जोर लावला होता. मात्र, ममता बॅनर्जीनी एक हाती लढत देताना भाजपला धुळ चारली व त्यांच्या नेतृत्वाची दखल संपूर्ण देशाला घ्यावी लागली. गोव्यात 2022 मध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेस उतरणार असे अगोदर कुणाला वाटले नव्हते. पण, त्यांनी गेल्या दोन-तीन महिन्यांपासून गोव्यात आपले काम सुरू ठेवले होते. त्यात काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते लुईझिन फालेरो यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने गोव्यात तृणमूल काँग्रेस संदर्भात चर्चा सुरू झालीय. पण, तृणमूल काँग्रेस आपली छाप या ठिकाणी पाडणार का? हा खरा प्रश्न निर्माण झालाय.
तसे पाहता तृणमूल काँग्रेसने या पूर्वी गोव्यात आपले पाय ठेवले होते. मात्र, येथील मतदारांनी त्यांना साथ दिली नव्हती. त्यामुळे त्यांना माघार घ्यावी लागली होती. आज तृणमूल काँग्रेस पुन्हा एकदा गोव्यात सक्रीय होऊ पहात आहे. मुळात तृणमूल काँग्रेसचे कोणतेच कार्य या ठिकाणी नव्हते. अशा वेळी नव्याने या पक्षाला सुरवात करावी लागणार आहे. त्यात लुईझिन फालेरो सारखे नेते त्यांच्या गळाला लागल्याने, पक्ष बांधणीत थोडीफार मदत होईल असे वाटत असले तरी निवडणुकीला जास्त कालावधी शिल्लक राहिला नसल्याने तृणमूल काँग्रेससमोर पक्ष बांधणी आव्हान असेल.
काँग्रेस पक्षात लुईझिन फालेरो यांना योग्य मान-सन्मान दिला जात नव्हता. त्यामुळे ते नाराज झाल्याचा दावा त्यांच्या समर्थकांनी ते अधिकृतपणे तृणमूल काँग्रेसमध्ये सहभागी होण्याच्या दोन-तीन दिवस अगोदर केल्याने, ही त्याचीच चाल असावी अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. काँग्रेस पक्षातून बाहेर पडण्यासाठी ते काही तरी कारण शोधीत होते का ? असा प्रश्न ही आत्ता उपस्थित झालेला आहे. लुईझिन फालेरो यांनी आपण गेले 20-25 दिवस चिंतन, मनन करीत होतो. आपली तपश्चर्या सुरू होती असे विधान केल्याने, तृणमूल काँग्रेसचे नेते त्यांच्या संपर्कात होते याला पुष्टी मिळत आहे. श्री. फालेरो यांना बंगालमधून राज्यसभेवर खासदार म्हणून पाठविण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. राज्यसभेवर खासदारपद मिळत असल्याने त्यांनी काँग्रेस पक्षाचा त्याग केला असा प्रश्नही उपस्थित झालेला आहे.
लुईझिन फालेरो सोबत ज्यांनी तृणमूल काँग्रेस मध्ये प्रवेश केलाय ते त्यांचे समर्थक आहेत. अपवाद फक्त माजी आमदार लवू मामलेदार यांचा. लवू मामलेदार हे फोंडय़ात रवी नाईक यांच्याकडून पराभूत झाल्यानतंर सक्रीय राजकारणापासून दूरच होते. फक्त शिरोडा मतदारसंघात झालेल्या पोट निवडणुकीत मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांचा पराभव करण्यासाठी ते भाजपच्या गोटात सामील झाले होते. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन मगो पक्षावर तोंडसुख घेतले होते. त्यानंतर ते सक्रीय राजकारणापासून दूरच होते. आत्ता तृणमूल काँग्रेसने त्यांना आपल्या जाळय़ात ओढले आहे. आपण तृणमूल काँग्रेसच्या उमेदवारीवर मडकई मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहे. मडकई मतदारसंघात सुदिन ढवळीकर यांचा पराभव करणे हे त्यांचे टार्गेट असले तरी लवू मामलेदार यांना ते शक्य होणे कठीण आहे.
तृणमूल काँग्रेस स्वतंत्रपणे निवडणुकीत उतरणार की, येथील स्थानिक पक्षांकडे यूती करून निवडणूक लढविणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यासाठी थोडे दिवस प्रतिक्षा करावी लागणार आहे. तृणमूल काँग्रेस नव्याने सुरवात करीत असल्याने तसेच त्यांना त्यांचे उद्दिष्ठ गाठण्यासाठी स्थानिक पक्षाची मदत घ्यावी लागणार असे सध्याचे चित्र आहे. त्यासाठी गोवा फॉरवर्ड व मगो हे दोन पर्याय त्यांच्यासमोर आहेत. हे पर्याय निवडले तर काही प्रमाणात तृणमूल काँग्रेस आपली छाप पाडू शकेल.
लुईझिन फालेरो यांच्याकडे नावेली मतदारसंघात स्वताची अशी मते आहेत. त्याच पद्धतीने लवू मामलेदार यांच्याकडे काही मते आहेत. पण, यातून तृणमूल काँग्रेस आपला प्रभाव पाडण्याची शक्यता कमीच आहे. मुळात पक्षाचे कोणतेच कार्य नसताना तृणमूल काँग्रेसने गोव्यात प्रवेश केलेला आहे. आत्ता ते इतर पक्षांतील नेत्यांना व कार्यकर्त्यांना सोबत नेऊन पक्षाची बुनियाद घालू पहात आहेत. तृणमूल काँग्रेसने बंगालच्या निवडणुकीनंतर त्वरित गोव्यावर आपले लक्ष केंद्रीत केले असते तर आज तृणमूल काँग्रेसला एक पर्याय म्हणून पाहिले जाणे शक्य होते. मात्र, अवघ्या चार-पाच महिन्यात तृणमूल काँग्रेस हा पर्याय म्हणून निवडणे कठीण आहे.
तृणमूल काँग्रेस समोर गोव्यात अनेक आव्हाने आहेत. त्यात प्रमुख आव्हान असेल ते पक्षाची बांधणी करण्याचे. हे आव्हान ते कशा प्रकारे पेलतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. पक्षाची बांधणी करण्यासाठी कार्यकर्त्यांची फळी लागते. ही फळी सध्या तरी त्यांच्याकडे नाही. इतर पक्षांतून प्रवेश केलेले नेते स्वतः किती पक्षाच्या कार्यात झोकून देतात, यावर बरेच काही अवलंबून आहे.
लुईझिन फालेरो यांच्याकडे गोव्याची जबाबदारी देतात की अन्य कुणाकडे हे देखील पाहणे तेव्हढेच महत्वाचे आहे. तृणमूल काँग्रेसने अनेकांकडे संपर्क साधलेला असला तरी त्यांना किती जण साथ देतात हे लवकरच स्पष्ट होणार आहे. भाजप विरोधी मतांमध्ये फुट पाडून भाजपला मदत करण्यामागचे हे षडयंत्र तर नाही ना अशी चर्चासुद्धा गोव्यात सुरू झालेली आहे. एकूणच तृणमूल काँग्रेसला मतदार स्वीकारतील का ? याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे.
महेश कोनेकर