यंदाची दिवाळी आणि लक्ष्मीपूजन खऱया अर्थाने तेजाचे पूजन ठरणार आहे. शेअर बाजारातील व्यवहारांमध्ये रस घेणाऱया वर्गाला त्यांच्या गुंतवणूकीवर चांगला परतावा मिळू लागला आहे. शेअर बाजार मागच्या काही दिवसांपासून तेजीत आहे. दिवाळीत तो आणखी तेजाळतो आहे. सेन्सेक्स पुन्हा 60 हजारांवर गेला असून, सध्याची स्थिती पाहता शेअर बाजारात किरकोळ करेक्शन वगळता वातावरण चांगले राहील, अशी अपेक्षा आहे. गुंतवणूकीप्रती आवड असणारे बरेचजण कोरोनानंतर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याकडे वळले आहेत. बँकांतील घटते व्याजदर, अशाश्वती, याचाही हा परिणाम मानला जात आहे. त्याचबरोबर प्लॅन बी म्हणूनही मार्केटचा विचार केला जात आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तासभर शेअर बाजार सुरू असतो. या शुभमुहूर्तावर शेअर खरेदी करण्याकडे मोठा कल असतो. त्यामुळे या शुभदिनी बाजार कसा तेजीत राहतो, याकडे अनेकांचे लक्ष असेल. बाजारात तेजी असली म्हणजे उद्योग व्यवसायाला मोठय़ा प्रमाणावर भांडवल पुरवठा होत असतो. या भांडवलासाठीची गुंतवणूक करणाऱयांना चांगला परतावा मिळू लागलातर इतर मार्गांपेक्षा शेअर्समध्ये गुंतवणुकीला लोक प्राधान्य देतात हे आतापर्यंत अनेकदा दिसून आले आहे. केवळ कर्जाची उभारणी करून उद्योग व्यवसाय भरभराटीला जात नाही. त्यामुळे खुल्याबाजारातून शेअर्सच्या विक्री मार्फत भांडवलाची उभारणी करण्याला सर्वसामान्यांपासून शासनापर्यंत सर्वांनीच प्राधान्य दिले आहे. गेल्या काही वर्षातील भांडवली बाजाराची कामगिरीही खरोखरच कौतुकास्पद ठरलेली आहे. बाजाराच्या वाढीमागची गणिते काय? याचे आश्चर्य अनेकदा रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नरसुद्धा व्यक्त करताना दिसतात. मात्र, सर्वांच्या अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी सध्या भांडवल बाजारात होताना दिसत आहे. राष्ट्रीयीकृत बँकांनी घटवलेला व्याजदर आणि लोकांची गरज या दोन बाबींचा विचार केला तर चांगला परतावा देणारे शेअर्स खरेदी करण्यावर नागरिकांचा भर आहे आणि ही संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. साक्षरतेचे प्रमाण वाढेल तसे बाजारात गुंतवणूकदार वाढू लागले आहेत आणि त्यामुळेच कठीण कालखंडामध्येसुद्धा भारतीय भांडवली बाजाराने चांगली कामगिरी करून दाखवली आहे. उत्पादक कंपन्या आणि त्यांच्या उत्पादनांचा खप हा प्रदीर्घकाळ चर्चेचा मुद्दा राहिला आहे. त्या दृष्टीने पाहिले तर वाहन, बांधकाम अशा क्षेत्राकडे नेहमीच आशेने पाहिले जात होते. मात्र मध्यंतरीच्या काळात ही क्षेत्रेही पुरती डळमळीत झालेली दिसून आली. तरीही भांडवली बाजारात सुरू असलेली उलाढाल ही कौतुकास्पदच आहे. आता केंद्र सरकारकडून चांगली वाढ असणाऱयाना प्रोत्साहनाची आवश्यकता आहे. उत्पादनाच्या क्षेत्रातसुद्धा गेल्या काही महिन्यांमध्ये निर्माण झालेली घसरण आता थांबली आहे आणि अनेक क्षेत्रातील वस्तूंना मागणी वाढू लागली आहे. वस्तूंच्या तुटवडय़ामुळे अनेक ठिकाणी दरवाढीला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर दिवाळीत महाराष्ट्रात सरकारने जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा भासू देऊ नये या दृष्टीने नियोजन केले आहे. तर आवश्यक वस्तूंची मुबलक उपलब्धता व्हावी या दृष्टीने बाजारातून मागणी वाढू लागली आहे. त्याचाच परिणाम जीएसटी संकलनात दिसून आला आहे. दरम्यान, कच्च्या मालाची खरेदी वाढण्यासोबत मागणी वाढल्याने ऑक्टोबरमध्ये भारतातील उत्पादन प्रक्रिया आणखी गतीमान झाली आहे. सोमवारी झालेल्या मासिक पाहणीत ही माहिती देण्यात आली. उत्पादन आणि नव्या मागणीत ऑक्टोबरमध्ये सात महिन्यांत सर्वात वेगाने वाढ झालीय, असे सर्वेक्षणात म्हटले आहे. गेली दोन वर्षे जगभरातील मंदावलेला व्यवसाय आणि मागणीत झालेली घट लक्षात घेतली तर आता पुन्हा कुठेतरी नव्याने सुरुवात होण्याची लक्षणे आहेत. त्यादृष्टीने बाजारातून वाढत असलेली मागणी, लोकांच्या हातात खेळणारा पैसा आणि मध्यंतरीच्या काळात कमी पैशात काटकसरीने जीवन जगण्याची लागलेली सवय यामुळे नव्याने व्यवहार सुरू झाल्यानंतर आलेल्या पैशाची बचत करून त्यातून नव्याने काही उभारणी करण्यासाठी लोकांनी पुन्हा एकदा सुरुवात केली आहे. मध्यंतरीच्या काळात हात खर्चालाही आलेल्या मर्यादा लक्षात घेऊन आता लोकांनी पुन्हा एकदा गुंतवणूक सुरू केली आहे. सणाच्या निमित्ताने बाजारपेठेत गर्दी दिसू लागली आहे. ऑनलाइन मार्केटने त्याला मोठे आव्हान दिले आहे. स्थानिक पातळीवर डोळय़ासमोर बघून वस्तु खरेदी करण्याचा आनंद घेणारा ग्राहक जसा आहे त्याच पद्धतीने ऑनलाइन वस्तु मागणारा ग्राहकही आहे. स्थानिक व्यापाऱयांकडून महाग मिळत असल्याने ऑनलाईनकडे लोकांचा ओढा वाढतो आहे असे काही लोकांचे म्हणणे आहे तर ऑनलाइन फसवणूक होऊ लागल्याने लोक पुन्हा एकदा स्थानिक व्यापाऱयांकडे वळत असल्याचेही सांगितले जात आहे. इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या विपेत्यांनी ऑनलाइनच्या दरात स्थानिक पातळीवर वस्तू देण्यास सुरुवात केली आहे. तर मोठय़ा मॉल आणि ऍमेझॉनसारख्या बडय़ा भांडवलदार कंपन्यांनी ग्राहकांना स्थानिक बाजारपेठेपेक्षा स्वस्तात माल पुरवण्यास सुरुवात केली आहे. प्रारंभीच्या काळात ऑफर्सही आकर्षक असल्याने लोकांचा त्याकडे ओढा आहे. आपल्याकडच्या एकूणच वाढत्या लोकसंख्येने सर्व प्रकारच्या व्यापाऱयांना ग्राहक मिळत असल्याने वातावरण आनंदीआनंद आहे. उत्पादकांनाही यामुळे एक चांगली संधी प्राप्त झाली आहे. अनेक स्थानिक उत्पादकांनी उत्तमोत्तम वस्तु बाजारात आणून या संधीचा लाभ घेण्याचे प्रयत्न चालवले आहेत. दिवाळीच्या काळात होत असणारी ही उलाढाल वाखाणण्याजोगी म्हणता येईल. सर्वच गोष्टींना वाढती मागणी पाहता नोकरी-रोजगाराच्या संधी या क्षेत्रात नव्याने उपलब्ध होऊन अनेकांच्या पोटापाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. त्यादृष्टीने आजच्या लक्ष्मीपूजनापासून एक चांगली सुरुवात व्हावी आणि प्रत्येकाला आपापल्या अवकाशात प्रगतीची संधी मिळावी हीच दिवाळीच्या निमित्ताने शुभेच्छा.
Previous Articleगुरुग्राममध्ये खुल्या जागेत नमाज पठणावर बंदी
Next Article विजयाच्या ट्रकवर परतण्याचे कांगारुंचे लक्ष्य
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.