वर्षाच्या सुरूवातीला कोरोनाचा उदेक झाल्यानंतर शेअर बाजारात चांगलीच पडझड झाली. पण त्यातून अल्पावधीतच शेअर बाजार सावरले आणि तेजीचा कल दर्शवू लागले. गेल्या दोन महिन्यांपासून तर सातत्याने तेजीचा कल दिसून येत आहे. गेल्या आठवडय़ात निफ्टीत 21 अंकांची तर सेन्सेक्समध्ये 11.57 अंकांची किरकोळ घसरण झाली. लॉकडाऊनच्या काळात एका बाजूला देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली असताना शेअर बाजारात तेजी दिसून येत आहे. या मागे नेमके कोणते रहस्य आहे?
सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात अनेक उद्योग व्यापार ठप्प झाले आहेत पण शेअर बाजारात मात्र सातत्याने तेजी दिसून येत आहे. अनेक शेअर्समध्ये चांगली गुंतवणूक होताना दिसत आहे. वास्तविक पाहता अनेक दिग्गज कंपन्यांचे तिमाही परिणामही निराशाजनक आहेत. एरवी असे परिणाम आले असते तर त्या कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळताना दिसले असते. पण आता शेअर बाजारात गुंतवणूक होत आहे. मार्चमध्ये आपटी खाल्ल्यानंतर विविध शेअर्सचे दर चांगलेच घसरले आणि आता त्याचा फायदा गुंतवणूकदार गुंतवणूक करण्यासाठी करत आहेत. हे एक कारण तेजीमागे आहे.
गुंतवणूकदारांचा शेअर बाजारावरील विश्वास अबाधित राहिला आहे असेही म्हणता येईल. सध्या इतर अनेक गोष्टी बंद असताना शेअर बाजारातून पैसे कमावण्याचा एक पर्याय आपसूकच अनेक जणांसमोर आहे. घरबसल्या हे काम करता येते. त्यामुळे शेअर बाजारात नव्या गुंतवणूकदारांची संख्याही वाढली आहे.
जागतिक स्तराचा विचार केला तर गेल्या एक महिन्यापासून डॉलर जगातील महत्वाच्या चलनांच्या तुलनेत दुबळा होत चालला आहे. त्यामुळे विकसनशील देशांमध्ये रोख पैशाचा ओघ वाढला आहे. त्यामुळे शेअर बाजारांतही परदेशी संस्थात्मक गुंतवणुकीचा ओघ वाढला आहे. अर्थात डॉलरचे दुबळेपण किती काळ राहते यावर हा गुंतवणुकीचा ओघ वाढतो की कमी होतो हे ठरेल. त्याचबरोबर जगातील महत्वाच्या देशांनी व्याजाचे दर शून्यावर आणून ठेवले आहेत. यामुळेही शेअर बाजारात पैशाचा ओघ वाढला आहे.
वेगवेगळय़ा देशांच्या सरकारांनी जाहीर केलेली आर्थिक पॅकेजेसही शेअर बाजारातील गुंतवणूक वाढवण्यास कारणीभूत ठरली आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर आजपासून सुरू होणारा आठवडा शेअर बाजारासाठी कसा असेल हे पाहणे आवश्यक ठरते. सध्याच्या परिस्थितीत नाही म्हटले तरी विसंगती दिसते आहे. म्हणजे निफ्टी तेजीत आहे तर आर्थिक स्थिती सातत्याने घसरते आहे. केवळ कमी व्याजदर आणि रोखता यावर भिस्त ठेवून शेअर बाजाराची वाटचाल सुरू आहे. लहान आणि मध्यम उद्योग क्षेत्राला कोरोनाचा चांगलाच फटका बसला आहे. तरीही सरकारच्या मदतीने हे क्षेत्र उभे राहण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यात त्याला यशही येत आहे.
परिस्थिती गोंधळात टाकणारी असली तरी त्यातून वाट काढणे आवश्यकच आहे. त्यासाठी ज्या कंपन्यांत तुम्हाला गुंतवणूक करायची आहे त्यांचे विश्लेषण करा. तुमचा दर निश्चित करा आणि वाट पहा. एखादी लाट आल्यावर घाईघाईने गुंतवणूक करायला जाऊ नका. त्या लाटेचा फायदा घेता आला नाही म्हणून दुःखही करत बसू नका. कारण अनेकदा अशा प्रकारे घाईघाईने केलेल्या गुंतवणुकीचा नंतर पश्चात्ताप करावा लागतो.
सर्वात महत्वाचे म्हणजे शेअर बाजाराचा अभ्यास स्वतःचा स्वतः करा. कोणत्याही सल्ल्याची वाट पाहू नका. तज्ञांचा सल्ला प्रत्येक वेळी योग्य असेलच असे नाही. आपण ज्या कंपन्यांचे शेअर घेणार त्या कंपनीचा अभ्यास, विश्लेषण आपणच करणे आवश्यक आहे. आपल्या अभ्यासावर विसंबूनच आपण गुंतवणूक करावी. सध्याच्या काळात तरी हाच फंडा वापरण्याची गरज आहे.
आता जागतिक अर्थव्यवस्था हळूहळू खुली होत आहे. पण ती खुली होत असताना अनिश्चतिता कमी झालेली नाही. जगाच्या पाठीवर कोरोना रूग्णांची संख्या कमी होताना दिसत नाही आणि हा उदेक नेमका कधी थांबणार याचा अंदाजही बांधता येत नाही. त्यामुळे अर्थव्यवस्था खुली होत असली तरी ती कोणत्या वेगाने पूर्वपदावर येईल याबद्दल काहीच सांगता येत नाही. त्यामुळे शेअर बाजारांतही तेजीचा कल दिसत असला तरी फारशी अपेक्षा न ठेवता थोडा फायदा मिळाला तरी तो घेण्याकडेच गुंतवणूकदारांनी लक्ष केंद्रीत करावे हे उत्तम.
सध्याच्या काळातही आपला फायदा कायम टिकवू शकलेल्या कंपन्यांवर लक्ष केंद्रीत करणे योग्य ठरेल.
1. जस्ट डायल – या कंपनीच्या शेअरची किंमत सध्या 377.65 रू. आहे. 52 आठवडय़ाचा उच्चांक 756.45 रू. इतका होता. त्यापासून जवळजवळ 50 टक्के दर आता खाली आला आहे. या कंपनीचा निव्वळ नफा आर्थिक वर्ष 2020 मध्ये 32 टक्के, 19 मध्ये 44 टक्के आणि 18 मध्ये 18 टक्के असा आहे. कंपनीची कामगिरी चांगलीच आहे.
2. एमएएस फायनान्शयिल सर्विसेस – कंपनीच्या शेअरच्या दरातही 47 टक्के घसरण झाली आहे. 1269 वरून तो 675.45 वर आला आहे. कंपनीचा या वषीचा आतापर्यंतचा फायदा 17 टक्के आहे.
3. बंधन बँक – सध्या शेअरचा दर 350 रू. आहे. 650 वरून तो इतका खाली आला आहे. बँकेला सध्या 55 टक्के फायदा दर्शवला गेला आहे, 19 मध्ये 45 टक्के आणि 18 मध्ये 21 टक्के दर्शवला गेला आहे.
याप्रमाणेच केईआय इंडस्ट्रीज, गॉडप्रे फिलीप्स, जेएसडब्लू होल्डींग्ज, आवास फायनान्सियर्स या कंपन्यांच्या समभागांच्या वाटचालीवरही लक्ष ठेवण्याची गरज आहे.
– संदीप पाटील