वृत्तसंस्था / मुंबई
चालू आठवडय़ाचा प्रारंभाच्या दिवशी शेअर बाजाराने कोरोनाची भीती न बाळगता तेजीची उसळी नोंदवली होती. परंतु त्याच्या दुसऱया दिवशीच्या व्यवहारात मात्र बुधवारी शेअर बाजाराने तब्बल 1500 अंकांची तेजी पार करुनही अंतिम क्षणी बाजाराने मात्र निराशाजनक कामगिरी केली. दिवसअखेर बीएसई सेन्सेक्स 173.25 अंकानी घसरुन निर्देशांक 29,893.96 वर बंद झाला तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी दिवसअखेर 43.45 अंकानी घसरुन निर्देशांक 8,748.75 वर बाजार बंद झाल्याचे दिसून आले.
दिवसभरात बाजारात जवळपास तीन तासाहून अधिक वेळ तेजीचा सिलसिला राहिला होता. परंतु अंतिम क्षणी ही तेजी टिकवण्यात बाजाराला यश मिळाले नाही. मंगळवारच्या सत्रात मात्र मागील काही दिवसांपासूनची मरगळ झटकून टाकत बाजार सरसावल्याचे दिसून आले होते. त्याच्या दुसऱयाच दिवशी गुंतवणूकदारांना बाजाराने चिंतेत पाडल्याचे तज्ञांनी म्हटले आहे. दिग्गज कंपन्यांमध्ये बँकेच्या समभागांना घसरणीचा सामना करावा लागला आहे. यात सिटी युनियन बँक 1.83, आरबीएल बँक 3.44, स्टेट बँक 1.48, कोटक बँक 1.13, एचडीएफसी बँक 1.19 आणि ऍक्सिस बँकेचे समभाग 3.65 टक्क्मयांनी घसरले आहेत.
कोरोनाची धास्ती कायम आंतरराष्ट्रीय शेअर बाजारांनी काल केलेल्या कामगिरीमुळे जगातील विविध शेअर बाजारांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. परंतु जगातील कोरोनाची वाढती संख्या त्यातुन होणारे मृत्यू आणि त्याच्या धास्तीने पुन्हा जागतिक स्तरासह देशातील शेअर बाजारात घसरण झाल्याचे दिसून आले आहे. परिस्थिती पाहता लवकरात लवकर कोरोनाला थोपविण्यासाठी जगातील देश एकत्रित येऊन मार्ग काढण्याची आवश्यकता आहे. अन्यथा न भरुन निघणारे आर्थिक नुकसान जगाला सहन करावे लागणार असल्याचे तज्ञांनी म्हटले आहे. ही परिस्थिती आणखी काही दिवस अशीच राहते की काय हे पाहावे लागेल.