देवाचे-गोठणे-सोगमवाडीतील झिंबरे यांची तक्रार
वार्ताहर / राजापूर
गावामध्ये बाराव्या दिवशी सर्व विधी करण्याची प्रथा असताना तेरावा आणि चौदाव्याचा विधी त्यानंतर स्वतंत्रपणे केला. त्यामुळे गावकर, वाडीप्रमुख व अन्य ग्रामस्थांनी सामाजिक बंधने लादून बहिष्कृत केल्याची तक्रार राजापूर तालुक्यातील देवाचे-गोठणे सोगमवाडी येथील सदानंद तानाजी झिंबरे व त्यांच्या भावकीने जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.
27 डिसेंबर 2020 रोजी चुलते ऊमाजी झिंबरे यांचे वृद्धापकाळाने निधन झाल्यानंतर त्यांचे अंतिम धार्मिक विधी हिंदू रूढी रिवाजाप्रमाणे दहावा, बारावा व तेरावा विधीद्वारे करण्यात आला. याचे निमंत्रण सर्व गावकर व ग्रामस्थांना देऊनही तेराव्या व चौदाव्या विधीला कोणी उपस्थित राहिले नाहीत. तसेच या विषयासंदर्भात गावाची बैठक बोलावून वाडीने सांगितल्याप्रमाणे सर्वजण अंतिम धार्मिक विधी बाराव्या दिवशी संपवत आहेत. तुम्ही तेरावा व चौदावा विधी करून नियमांचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे गावाची माफी मागावी व गावच्या प्रथेप्रमाणे विधी आटपावे, असे सांगण्यात आल्याचे झिंबरे यांनी तक्रार अर्जात नमूद केले आहे. मृत व्यक्तीचे विधी हे पूर्वापार चालत आलेल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे केलेले आहेत. त्यामुळे गावकऱयांचा निर्णय बेकायदेशीर व धार्मिक स्वातंत्र्याला बाधा आणणार असून तो मान्य नाही, अशी भूमिका घेतल्याने गावकऱयांनी झिंबरे भावकी गावाची माफी मागत नाही तोपर्यंत त्यांना कोणत्याही सामाजिक कार्यात हाक बसणार नाही, तसेच सामाजिक कार्यात सहभागी करून घेतले जाणार नाही, कोणीही त्यांच्याकडे जाणार नाही, असा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आपल्या सामाजिक व वैयक्तिक स्वातंत्र्यावर गदा आली असून हा निर्णय बेकायदेशीर व सामाजिक बहिष्कार टाकण्यासारखा असून संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी सदानंद झिंबरे, जयदास झिंबरे व त्यांच्या भावकीने केली आहे.