ओटवणे/ प्रतिनिधी-
तेरेखोल नदीचे पात्र पूर्णतः गाळाने भरल्यामुळेच ही नदी उथळ बनली आहे. पर्यायाने गेली अनेक वर्षे या नदीच्या पुराचे पाणी शिरून याचा फटका आठ गावांना बसत आहे. त्यामुळे अनेक वर्षापासून साचलेला तेरेखोल नदीतील गाळ उपसून तसेच संरक्षण भिंत उभारून नदी परिसरातील घरांसह शेती बागायतीचे पुरापासून संरक्षित करा. अशी मागणी ओटवणे पंचक्रोशीतील शिष्टमंडळाने प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांची भेट घेऊन केली.
यावेळी तेरेखोल नदिसह जिल्हयातील अन्य नद्यामधील साचलेल्या गाळाबाबत सर्वेक्षण करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यानी दिले असून. त्यानुसार या नद्यामधील गाळ काढण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात येणार आहे. या प्रस्तावाला मंजूरी मिळाल्यानंतर पावसाळ्यानंतर या नदीतील गाळ उपसा करण्याची ग्वाही सावंतवाडीचे प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांनी या शिष्टमंडळाला दिली.
यावेळी शिवसेना सावंतवाडी तालुका प्रमुख रुपेश राऊळ, शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, माजी उपसभापती विनायक दळवी, कृष्णा सावंत, विलवडे सरपंच रावजी दळवी, माजी सरपंच बाळकृष्ण दळवी, ओटवणे माजी सरपंच रविंद्र म्हापसेकर, माजगाव शिवसेना विभाग प्रमुख संजय माजगावकर, उपविभाग प्रमुख उमेश गावकर, उपविभाग प्रमुख आनंद दळवी, शिवसेना विलवडे शाखाप्रमुख नंदकिशोर दळवी, रामदास सावंत, गोपाळ माधव आदी ओटवणे, सरमळे, विलवडे गावातील पूरग्रस्त उपस्थित होते.