कोकण रेल्वे मार्गावर विद्युतीकरण काम करणाऱया बोगीला आग : सुदैवानेच जीवितहानी टळली
मार्गावरील वाहतूक दोन तास ठप्प : काही वेळेतच उडाला आगीचा भडका : अग्नीशमन दलाकडून आग आटोक्यात
वार्ताहर / कुडाळ:
कोकण रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण सुरू असून या कामासाठी वापरण्यात येणारी वायरिंग कोच विशेष बोगीला बुधवारी सकाळी 9.30 च्या सुमारास कुडाळ-झाराप दरम्यान तेर्सेबांबर्डे रेल्वे गेटजवळ काम सुरू असताना आग लागली. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक दोन तास ठप्प झाली होती. दरम्यान, कामगारांना आग लागल्याचे लक्षात येताच त्यांनी आरडाओरड केली. त्यामुळे बोगी थांबविण्यात आली. त्यानंतर आतील एक इंजिनिअर, ऑपरेटर व सहा कामगार यांनी वेळीच बाहेर उडय़ा मारल्याने जीवितहानी टळली. मात्र, बोगी व आतील सामानाचे मोठे नुकसान झाले. ही आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झाले नाही. बोगीत असलेल्या ज्वलनशील साहित्यामुळे आग लागली असावी, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली. कुडाळ एमआयडीसीच्या अग्नीशामक दलाने तातडीने घटनास्थळी जाऊन आगीवर नियंत्रण मिळविले. सावंतवाडी येथील अग्नीशामक दलही दाखल झाले होते.
कोकण रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण युद्धपातळीवर सुरू आहे. कुडाळ ते झाराप दरम्यान काम सुरू असताना विद्युतीकरणासाठीच्या वीज वाहिन्या योग्यप्रकारे लावण्यासाठी विशेष बोगी वापरण्यात येते. रेल्वे गाडीची उंची व विद्युत वाहिन्या या योग्यप्रकारे लावल्या जाव्यात, यासाठी या बोगीचा वापर केला जातो. रेल्वेच्या मुख्य मार्गावर 352 / 6 या कुडाळ-झाराप दरम्यान तेर्सेबांबर्डे गेटजवळ लाईन ओढण्याचे काम सुरू होते. त्यावेळी आज सकाळी 9.30 च्या सुमारास चालत्या बोगीला आग लागली. यावेळी एल अँड. टी कंपनीचे काही कामगार बाहेर काम करत होते, तर सहा कामगार व ऑपरेटरसह ज्युनिअर इंजिनीअर जगदिश शेलार बोगीत होते. आग लागल्याचे लक्षात येताच, ऑपरेटरने बोगी थांबविली. त्यानंतर सर्व कामगारांनी सुरक्षितरित्या बाहेर उडय़ा मारल्या.
अन् काही वेळेतच उडाला आगीचा भडका
आग लागल्यानंतर वारा आल्याने आर. ई. कोचमध्ये आग पसरली. काही वेळेतच आगीचा भडका उडाला. धुरांचे लोट उठले. स्थानिक ग्रामस्थांना हे वृत्त समजताच आग व धुराच्या दिशेने त्यांनी धाव घेतली.
कुडाळ स्थानकाला दिली तातडीने कल्पना
बोगीला आग लागताच विद्युतीकरणाचे काम करणाऱया अधिकारी व कर्मचाऱयांनी तत्काळ झाराप व कुडाळ स्थानकांना याबाबत माहिती दिली. झाराप स्टेशन मास्तर प्रज्ञा नाईक व सहकाऱयांनी कुडाळ एमआयडीसी तसेच सावंतवाडी येथील अग्नीशामक दलाला पाचारण केले. तसेच रेल्वे प्रशासनालाही कळविले.
आगीच्या ज्वाळांनी लोक घाबरले
तेर्सेबांबर्डे, झाराप परिसरातील लोकांना धुरांचे लोट व आगीच्या ज्वाला दिसू लागल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. अनेकांनी रेल्वे स्टेशनच्या कर्मचाऱयांशी संपर्कही साधला. प्रवासी रेल्वेला आग लागल्याची भीती अनेकांनी व्यक्त केली. मात्र, वस्तूस्थिती समजताच अनेकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
रेल्वे कर्मचारी घटनास्थळी दाखल
घटनेची माहिती मिळताच कोकण रेल्वेच्या अधिकारी, कर्मचाऱयांनी घटनास्थळी धाव घेतली. रेल्वे यंत्रणा व यंत्र सामुग्रीला धोका पोहचणार नाही, याची खबरदारी त्यांनी घेतली.
आग आटोक्यात आणण्यात यश
बोगीला आग लागल्यानंतर कुडाळ एमआयडीसी येथील अग्नीशामक दलाला पाचारण करण्यात आले. काही मिनिटातच बंब घटनास्थळी दाखल झाला. त्यांनी पाण्याचा मारा करून आग विझविली. अग्नीशमन विमोचक राणे, फायर ऑफिसर ए. आर. तडवी, फायरमन सावेकर, गोडे, पतंगे, परब, चालक शिंदे व डिचोलकर यांनी यात सहभाग घेतला. सावंतवाडी न. प.चाही अग्नीशामक बंब घटनास्थळी दाखल झाला होता. इलेक्ट्रिक इंजिनिअर सिद्धेश गवस उपस्थित होते.
मनुष्यहानी नाही : बोगीचे मोठे नुकसान
या दुर्घटनेत सुदैवाने मनुष्यहानी झाली नाही. तसेच कोणी जखमीही झाले नाही. सर्व कामगार सुखरुप असल्याचे सांगण्यात आले. मात्र, आर. ई. बोगीसह आत असलेल्या साधनसामुग्रीचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र, बोगीच्या इंजिनाला हानी पोहोचली नाही.
दुर्घटनेचे कारण गुलदस्त्यात
कोकण रेल्वे मार्गाचे विद्युतीकरणाचे काम एल अँड टी ही कंपनी करत असून बोगीही कंपनीचीच आहे. फक्त कामावर सुपर व्हीजन कोकण रेल्वेचे अधिकारी करत आहेत. कोचला आग कशी लागली, याचे कारण संबंधितांकडून उशिरापर्यंत सांगण्यात आले नव्हते. या प्रकरणाची चौकशी झाल्यावर आग कशी लागली हे समजेल, असे सांगण्यात आले. मात्र, संबंधित अधिकाऱयांनी मोबाईल कॉलला प्रतिसाद दिला नाही.
पोलीसही घटनास्थळी दाखल
घटनेची माहिती मिळताच कुडाळचे पोलीस निरीक्षक शंकर कोरे व सहकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेची माहिती घेण्याचा प्रयत्न केला.
दोन तास वाहतूक ठप्प
या दुर्घटनेमुळे कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक तब्बल दोन तास ठप्प झाली होती. दुपारी 11.30 वाजता दुर्घटनाग्रस्त बोगी झाराप रेल्वे स्थानकाजवळ आणून ठेवण्यात आली. त्यानंतर 11.40 वाजता मार्ग वाहतुकीला खुला करण्यात आला. या घटनेमुळे राजधानी एक्सप्रेससह जनशताब्दी, मांडवी एक्सप्रेस या गाडय़ा लगतच्या स्थानकांवर थांबवून ठेवण्यात आल्या होत्या.
ज्वलनशील पदार्थांमुळे आग?
बोगीत असलेल्या ज्वलनशील पदार्थ किंवा वस्तूंमुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. बोगीत कामगार जेवणही करत असत, अशी चर्चा पुढे आली आहे. त्यामुळे आग लागल्याचे बोलले जात आहे.