ऑनलाईन टीम / हैदराबाद :
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी तेलंगणातील लॉक डाऊनची मुदत वाढवण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता तेलंगणामधील लॉक डाऊन 29 मे पर्यंत सुरू रहाणार आहे.
देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी तेलंगणा सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. सध्या देशात तिसऱ्या टप्प्यातील लॉक डाऊन 17 मे पर्यंत लागू आहे. तो संपण्याआधीच असा निर्णय घेणार तेलंगणा सरकार पहिलाच राज्य ठरले आहे.
मुख्यमंत्री चंद्रशेखर राव म्हणाले, तेलंगणात कोरोनाचे 1 हजार 96 रुग्ण आढळले आहेत. यापैकी 628 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तसेच तेलंगणातील मृत्युदर 2.64 वर आहे.
पुढे ते म्हणाले, नागरिकांनी जीवनावश्यक वस्तू सायंकाळी सहा पर्यंत खरेदी कराव्यात. सायंकाळी 7 नंतर राज्यात कर्फ्यू असेल. सायंकाळी 6 नंतर कोणी बाहेर पडताना दिसल्यास पोलीस कठोर कारवाई करतील, असे सांगत मुख्यमंत्री चंद्रशेखर यांनी जनतेला नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत.