सरकारच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह : न्यायालयाची टिप्पणी
वृत्तसंस्था / हैदराबाद
तेलंगणात बुधवारी भर रस्त्यामध्ये एका वकील दांपत्याची चाकूने वार करत हत्या करण्यात आली आहे. या प्रकाराची हादरवून टाकणारी चित्रफित समोर आली आहे. यात रक्ताने माखलेले वकील दांपत्य दिसून येते. तेलगंणा उच्च न्यायालयाने या प्रकरणाची दखल घेत सरकारच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तसेच आरोपींना लवकर अटक करण्याचा निर्देश दिला आहे.
भर रस्त्यात झालेल्या या घटनेदरम्यान लोक मूकदर्शक होऊन उभे होते. सरकारी बसेसही तेथून जाताना दिसून येतात, पण कुणीच या दांपत्याला वाचविण्याचा प्रयत्न केलेला नाही.
हैदराबादमधून परतत होते दांपत्य
पेद्दापल्ली जिल्हय़ाच्या मंथनी भागात राहणारे गट्टू वामनराव आणि त्यांची पत्नी वेंकट नागमणि हे तेलंगणा उच्च न्यायालयात वकील होते. वकील दांपत्य स्वतःच्या कारने बुधवारी हैदराबाद येथून मंथनीच्या दिशेने जात होते. कार चालक चालवित होता. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास रामगिरी मंडल गावानजकी त्यांच्या कारला काही अज्ञातांनी रोखले आणि चाकूने सपासप वार करत दोघांना गंभीर जखमी केले.
हादरवून टाकणारी चित्रिफत
या दुहेरी हत्येची हादरवून टाकणारी चित्रफित प्रसारित झाली आहे. यात पूर्ण प्रकार मोबाईलने चित्रित करण्यात आला आहे. चित्रफितीत वामनराव यांना रस्त्यावर रक्ताने माखलेल्या अवस्थेत पाहिले जाऊ शकते. तर महिलाही तडफडत असल्याचे दिसून येते. चित्रफितीत वामनराव आरोपीचे नाव कुंटा श्रीनिवास असल्याचे सांगताना दिसून येतात. हा आरोपी सत्तारुढ तेलंगणा राष्ट्र समितीचा सदस्य आहे.
पुरावे-साक्षीदार लवकरच जमवा
वकिलांच्या हत्येमुळे सरकारच्या विश्वासार्हतेवरच सवाल उपस्थित होतो. आरोपींना लवकर पकडले जावे. पुरावे आणि साक्षीदार कुठल्याही भीतीशिवाय जमविले जावेत असे म्हणत उच्च न्यायालयाने 1 मार्चपर्यंत सुनावणी स्थगित केली आहे. दांपत्याने अलिकडेच उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांसमोर तक्रार नोंदवून स्वतःच्या जीवाला धोका असल्याचे सांगितले होते. तर हत्येनंतर तेलंगणा बार असोसिएशनने न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार टाकला आहे.