चंदीगढ / वृत्तसंस्था
मागच्या वर्षी केंद्राच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱया पंजाबच्या शेतकऱयांना तेलंगणा राज्याच्या चंद्रशेखर राव सरकारने दिलेले चेक्स बाऊन्स झाले आहेत, अशी तक्रार पंजाबमधील अनेक शेतकऱयांच्या कुटुंबियांनी केली आहे. त्या आंदोलनात जे शेतकरी मृत्युमुखी पडले, त्यांच्या कुटुंबियांना धनादेश देण्यात आले होते.
प्रत्येक मृत शेतकऱयाच्या निकटच्या कुटुंबियांना तेलंगणाच्या चंद्रशेखर राव सरकारने तीन तीन लाख रुपयांचे चेक्स दिले होते. मात्र. पंजाबमधील अनेक शेतकऱयांचे चेक्स बाऊन्स झाले आहेत. पंजाबचे कृषी मंत्री कुलदीपसिंग धालीवाल यांनी या प्रकरणी लक्ष घालून शेतकऱयांना न्याय देण्याचे आश्वासन दिले आहे.
चेक बाऊन्स होण्याचे नेमके कारण काय याचा शोध घेण्यात येईल. कदाचित सरकारी कामकाजात काही चूक राहिल्याने चेक्स बाऊन्स झाले असतील. जी त्रुटी असेल ती दूर केली जाईल. तेलंगणा सरकारकडेही यासंबंधी विचारणा केली जाईल. सरकारच्या खात्यात पुरेशी रक्कम आहे काय, हे पाहिले जाईल. शेतकऱयांची किंवा कोणाचीही अशाप्रकारे चेष्टा करणे योग्य नाही, असे धालीवाल म्हणाले.
समारंभात दिले चेक्स
22 मे 2022 या दिवशी चंदीगढ येथे एक समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्या समारंभात चंद्रशेखर राव, अरविंद केजरीवाल आणि भगवंतसिंग मान हे तिन्ही मुख्यमंत्री उपस्थित होते. याच कार्यक्रमात चंद्रशेखर राव यांनी हे चेक्स दिले होते. आंदोलनात मृत्यू झालेल्या 24 शेतकऱयांच्या कुटुंबियांच्या नावे ते देण्यात आले. तसेच गलवान खोऱयात चीनशी झालेल्या चकमकीत मृत्यू झालेल्या सैनिकांच्या चार परिवारांनाही तीन्ही मुख्यमंत्र्यांनी 10, 10 लाख रुपयांचे चेक्स दिले होते. तसेच आंदोलन काळात मृत्यू झालेल्या शेतकऱयांच्या 543 शेतकऱयांच्या नातेवाईकांनाही नोडल अधिकाऱयांच्या माध्यमातून चेक्स देण्यात आले होते. मात्र, अनेकांचे चेक्स बाऊन्स झाल्याचे आढळले असून चौकशी करण्यात येत आहे.