धरणांच्या सुरक्षेसाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त
हैदराबाद, विजयवाडा / वृत्तसंस्था
कृष्णा नदीच्या पाण्यावरून तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या दोन राज्यांमध्ये मोठा संघर्ष भडकला आहे. दोन्ही राज्ये या नदीच्या जास्तीत जास्त पाण्याचा उपयोग करण्यासाठी एकमेकांशी स्पर्धा करत आहेत. यातून अनेक बेकायदेशीर जलविद्युत प्रकल्प आणि जससिंचन प्रकल्प दोन्ही राज्यांमध्ये उभे रहात असून त्यामुळे परिस्थिती आणखीनच चिघळली असल्याचे सांगण्यात आले.
दोन्ही राज्यांनी कृष्णा नदीवरील आपापल्या धरणांवर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. विशेषतः दोन्ही राज्यांच्या सीमेलगत असणाऱया पुलिचिंतला, श्रीशैलम, जुराला आणि नागार्जुनसागर धरणांवर अधिक लक्ष ठेवण्यात येत आहे. या धरणांना घातपातामुळे कोणताही धोका होऊ नये, याची दक्षता बाळगली जात आहे.
संपर्ष पूर्वीपासूनचाच
तेलंगणा राज्याची स्थापना आठ वर्षांपूर्वी झाली. तेव्हापासूनच दोन्ही राज्यांचा कृष्णा नदीच्या पाण्याच्या वाटपावरून संघर्ष सुरू आहे. पूर्वी दोन्ही राज्ये एक असतानाही काही जिल्हय़ांमधे हा वाद होता. तथापि आता त्याला राज्यस्तरीय संघर्षाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. दोन्ही राज्यांमध्ये लोकांनी मोर्चे काढले असून या नदीच्या अधिकाधिक पाण्यावर अधिकार सांगितला आहे.
अधिकारी हमरीतुमरीवर
दोन्ही राज्यांचे अधिकारी पाण्याच्या वाटपासंबंधी एकमेकांशी भांडताना दिसून आले. गेल्या दोन दिवसांपासून मतभेद, गैरसमज आणि अफवा यांना ऊत आला आहे. धरणांना धोका असल्याची अफवा काही दिवसांपूर्वी हेतुपुरस्सर उठविण्यात आली होती. तथापि, तिचा फारसा परिणाम दिसून आला नाही.
रायलसीमा प्रकल्प
आंध्र प्रदेशात रायलसीमा भाग कृष्णा नदीच्या पाण्यावर अधिक प्रमाणात अवलंबून आहे. रायलसीमा लिफ्ट इरिगेशन प्रकल्पाचे बांधकाम सध्या सुरू असून वाजवीपेक्षा जास्त पाणी साठविण्याचा आंध्रचा प्रयत्न असल्याचा आरोप तेलंगणा सरकार करीत आहे. आंध्रचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हस्तक्षेप करण्याची विनंती करणारे पत्र पाठविले आहे.