- सट्टेबाजांची मात्र जामिनावर सुटका
ऑनलाईन टीम / खम्मम :
तेलंगणामध्ये एक अजब प्रकार समोर आला आहे की ज्याने तुम्हाला दुःख होईलच असे नाही पण हसायला मात्र नक्कीच येईल. तेलंगणामधील पोलिसांनी दोन कोंबड्यांना अटक केली आहे. मागील 25 दिवसांपासून या कोंबड्या जेलच्या लॉकअप मध्ये बंद असून सुटकेच्या प्रतीक्षेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, काही सट्टेबाजांमुळे या कोंबड्यांना अटक करण्यात आली आहे. ज्या सट्टेबाजांमुळे या कोंबड्यांना अटक झाली त्या सट्टेबाजांना मात्र, जामीन मिळाला असून त्यांची सुटका करण्यात आली आहे. हे प्रकरण तेलंगणा मधील खम्मम जिल्ह्यातील आहे. येथील मिंदीगोडा पोलीस ठाण्यात गेल्या 25 दिवसांपासून बंद आहेत. पोलिसांनी त्यांना 10 जानेवारी रोजी अटक केली होती.
दरम्यान, संक्रातीच्या सणा निमित्त कोंबड्यांची झुंज लावण्याचा खेळ सुरू होतो. यावर सट्टेबाजी देखील होते. यावेळी पोलिसांनी सट्टेबाजांवर धाड टाकली. व घटनास्थळावरून 10 जणांना आणि 2 कोंबड्यांना ताब्यात घेतले.
त्यानंतर सट्टेबाजांना तर जामीन मिळाला पण कोंबड्या अजूनही जेलमध्येच आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या खटल्याच्या सुनावणीनंतरच या कोंबड्यांची सुटका होईल. कोंबड्यांच्या सुटकेचे आदेश मिळाल्या नंतर या कोंबड्यांची बोली लावली जाईल आणि जे जास्त पैसे देतील त्यांना कोंबड्या दिल्या जातील.