ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
तेलंगणामध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यााठी राज्य सरकारने 30 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये दररोज सकाळी सहा वाजल्यापासून दहा वाजेपर्यंत नागरिकांना अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी सूट देण्यात आली होती.
दरम्यान,यापूर्वी तेलंगणा सरकारने 22 मेपर्यंत लॉकडाऊन लागू केला होता. मात्र, वाढत्या रुग्ण संख्येला आळा घालण्यासाठी आता 30 मे पर्यंत लॉकडाऊन वाढविण्याची घोषणा करण्यात आली आहे.
या लॉकडाऊन कृषी आणि यासंबंधित क्षेत्रांना सूट देण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवांशी निगडीत क्षेत्रांनाही लॉकडाऊनमधून वगळण्यात आले आहे. यामध्ये औषध कंपन्या, वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत उपकरणांची निर्मिती करणाऱ्या कंपन्या, औषध वितरक आणि औषधांची दुकाने, त्याचप्रमाणे सर्व प्रकारच्या चिकित्सकीय आणि आरोग्य सेवांशी निगडीत व्यक्ती आदींचा समावेश आहे. सरकारी आणि खाजगी रुग्णालयांतील कर्मचाऱ्यांना विशेष पास दिले जाणार आहेत.
तेलंगणातील मंत्रिमंडळाने कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व जिल्हा मुख्यालयांवर दैनंदिन आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी आणि आरोग्य अधिकाऱ्यांसोबत सर्व जिल्हा अध्यक्षांची एक समिती स्थापन करण्याचा निर्णय देखील घेतला आहे.
दरम्यान, तेलंगणामध्ये काल 3,982 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर 5,186 रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यात आता एकूण संसर्ग झालेल्यांची संख्या 5,36,766 वर पोहोचली असून त्यातील 4,85,644 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आत्तापर्यंत एकूण 3,012 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.