आसाममधे अग्नीतांडव सुरुच, जैवसाखळीचे नुकसान
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आसाममधील तिनसुकिया जिल्हय़ामध्ये असलेल्या बागजान या तेलविहिरीला लागलेल्या आगामीध्ये दोघा कर्मचाऱयांचा मृत्यु झाला आहे. गेल्या 15 दिवसांपासून या विहिरीतील गॅस अनियंत्रितरित्या सुटत होता. त्यानंतर झालेल्या स्फोटामुळे आग धुमसत असून 30 किलोमीटरपासून अग्नीज्वाळा व धुराचे लोट दिसत आहेत. या स्फोटामुळे परिसरातील जैवसाखळीचे मोठे नुकसान झाले असून जंगल परिसरात आग लागली आहे.
दरम्यान, परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी एनडीआरएफ आणि सिंगापूरहून पाचारण करण्यात आलेले विशेष तज्ञांचे दल घटनास्थळी दाखल झाले आहे. ऑईल इंडिया लिमिटेडच्या मालकीच्या या विहिरी असून त्यातील बागजान विहिरीला आग लागली आहे. ही आग अटोक्यात आणण्यासाठी ऑईल अँण्ड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन (ओएनजीसी)च्या अग्निशमन दलाचे सुरक्षा कर्मचारी दाखल झाले आहेत. त्यातील दोघांचा आगीत होरपळून मृत्यु झाल्याचे सांगण्यात आले आहे. यामध्ये आसामचा युवा फुटबॉलपटू दुर्लोव गोगोई याचा समावेश आहे. बुधवारी सकाळी त्यांचे मृतदेह सापडले. ही आग पूर्णपणे अटोक्यात आणण्यासाठी चार आठवडय़ांचा कालावधी लागू शकतो. परिसरातील अनेक रहिवाश्यांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आल्याचेही ऑईल इंडियाचे प्रवक्ते त्रिदिव हजारिका यांनी सांगितले.
दरम्यान, मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी या घटनेविषयी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथसिंह, केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धमेंद्र प्रधान यांच्याशी फोनवरुन संवाद साधून माहिती दिली आहे. तसेच मदतीची मागणी केली आहे. विहिर परिसरामध्ये सफाईचे कामकाज सुरु असताना ही आग लागली. त्यानंतर त्याचा भडका उडाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. केंद्र सरकारने सर्व मदत देण्याचे आश्वासन दिले असून प्रसंगी वायुसेनेलाही तयार राहण्याचे आदेश देण्यात आल्याचे सांगितले. तर प्रत्यक्षदर्शीच्या मते दिब्रु साईखोवा राष्ट्रीय अभयारण्याजवळील या विहिरीत मंगळवारी दुपारी स्फोट झाल्याचे आवाज आले. त्यानंतर संपूर्ण परिसर काळय़ा धुराने आणि त्यानंतर आगीची ज्वाळांनी वेढल्याचे दिसून आल्याचे सांगितले. कोरोनापाठोपाठ या परिसरात आलेल्या या संकटामुळे स्थानिकांची जीवन अजूनच संकटात आले आहे.