‘कृषी सन्मान’चा हप्ता शेतकऱयांच्या खात्यात – देशातील 9.75 कोटी शेतकऱयांना 19,500 कोटी रुपये हस्तांतरित
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी 9.75 कोटी लाभार्थी शेतकऱयांना सुमारे 19 हजार 500 कोटी रुपये हस्तांतरित केले. ऑनलाईन माध्यमातून लाभार्थींच्या खात्यात रक्कम जमा केल्यानंतर पंतप्रधान मोदींनी देशभरातील शेतकऱयांशी संवाद साधला. याप्रसंगी त्यांनी पाम तेलासह स्वयंपाकाच्या तेलांमध्ये स्वयंपूर्ण होण्यासाठी पंतप्रधानांनी नॅशनल एडिबल ऑईल मिशन-ऑईल पाम या योजनेची घोषणाही केली.
नॅशनल एडिबल ऑईल मिशन-ऑईल पाम या योजनेंतर्गत आपल्याला तेलाच्या बाबतीत आयातीवरील अवलंबित्व कमी करण्याला प्रोत्साहन दिले जाईल, असे पंतप्रधानांनी सांगितले. देश सध्या तांदूळ, गहू, साखर या उत्पादनात स्वयंपूर्ण किंवा आत्मनिर्भर झाला आहे. मात्र, खाद्यतेलांच्या बाबतीत मोठय़ा प्रमाणात आयातीवर अवलंबून राहावे लागत आहे. हे अवलंबित्व कमी करण्यासाठी शेतकऱयांनी तेल उत्पादक धान्यांच्या मशागतीकडेही लक्ष द्यावे, असे पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीतील या व्हर्च्युअल कार्यक्रमाला कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमरही उपस्थित होते. त्यांनी कृषी योजनांची माहिती देत या क्षेत्रासाठी खर्च केलेल्या निधीची माहिती दिली. नवव्या हप्त्यापूर्वी केंद्र सरकारने या योजनेअंतर्गत तब्बल 11 कोटी लाभार्थ्यांना सुमारे 1.37 लाख कोटी रुपये वितरित केले होते. सरकारने 2.28 कोटी लाभार्थ्यांना किसान पेडिट कार्ड योजनेशी जोडले आहे. त्याअंतर्गत लाभार्थींनी आतापर्यंत 2.32 लाख कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज घेतल्याचेही तोमर यांनी सांगितले. कोरोना काळात शेतकऱयांनी खूप मेहनत घेत अधिकाधिक उत्पादन घेतले. त्यांच्या याच प्रयत्नांमुळे येत्या काळातही देशाला शेतीतून चांगले उत्पादन अपेक्षित आहे,’’ असे कृषिमंत्री तोमर म्हणाले.
पीएम-किसान योजनेंतर्गत सरकारने आतापर्यंत शेतकरी कुटुंबांना सुमारे 1.57 लाख कोटी रुपयांचे नऊ हप्ते दिले आहेत. या योजनेनुसार पात्र लाभार्थी शेतकरी कुटुंबांना प्रत्येकी 2 हजार रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये वर्षाला 6 हजार रुपये दिले जातात. या योजनेची घोषणा 2019 च्या अर्थसंकल्पात करण्यात आली होती. या योजनेंतर्गत मदतनिधी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केला जातो.