कासेगाव / वार्ताहर
वाळवा तालुक्यात मागील काही दिवसांपासून बिबट्या व त्यांच्या पिलांचे दर्शन वारंवार होत असून शेतकऱ्यांच्या पाळीव प्राण्यांवर हल्ल्याचे प्रमाण देखील वाढले आहे. त्यातच भर पडली ती नेर्ले-कापुसखेड रस्त्यावर घडलेल्या दुचाकीस्वरावरील हल्ल्याच्या प्रयत्नाची..! त्यामुळे माणसांच्या मनामध्ये बिबट्या विषयी भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याचाच प्रत्यय आला वाळवा तालुक्यातील काळमवाडी गावामध्ये. नेहमीप्रमाणे सचिन सूर्यवंशी यांच्या घरातील महिला डोंगरा शेजारच्या शेतामध्ये पावट्याच्या शेंगा तोडण्यासाठी गेल्या होत्या त्यावेळी त्यांना बिबट्याच्या पिला सारखा प्राणी दिसला. त्यामुळे त्यांची चांगलीच घाबरगुंडी उडाली, वेळेचे भान राखुन त्यांनी सचिन सूर्यवंशी, प्राणीमित्र स्वप्नील सूर्यवंशी व भाटवाडी येथील प्राणीमित्र गणेश निकम यांच्याशी संपर्क साधला असता यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन पाहिले तर ते बिबट्याचे पिल्लू नसून जखमी अवस्थेत उदमांजर असल्याचे सांगितले यावेळी हुश्श…! आम्हाला वाटलं बिबट्याचं पिल्लूच हाय, असे म्हणून महिलांनी सुटकेचा निःश्वास सोडला…!
मागील चार दिवसापूर्वी येथून चार – पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या वाटेगाव येथील उसाच्या फडात ऊस तोड सुरू असताना मजुरांना सुरवातीला बिबट्या व काही वेळाने त्याचे पिल्लू आढळून आले होते. त्यामुळे लोकांच्या मनातील भीती आणखीच वाढली आहे. वन विभागाने या दोघांची भेट घडवून मादी बिबट्याने आपल्या पिलाला तोंडामध्ये पकडून नैसर्गिक अधिवासात हलवलेचे वनविभागाच्या कॅमेऱ्याने टिपले होते. तो बिबट्या आपल्याकडेच आला कि काय? असे वाटल्यामुळे सर्वांची तारांबळ उडाली.
बिबट्या एका ठिकाणी न थांबता तो त्याचे अधिवासाचे ठिकाण वारंवार बदलत असतो. बिबट्या शक्यतो माणसावर हल्ला करत नाही. मुळात बिबट्याच्या खाद्यशृंखलेत मानव नाही. गावातील भटकी कुत्री, उंदीर – घुशी हे त्याचे मुख्य खाद्य ठरत आहे. जोपर्यंत बिबट्या गोंधळत नाही, तोपर्यंत माणसांवर हल्ला करत नाही. त्याने सहजीवन स्वीकारले असून, आपणही विशेष काळजी घेतल्यास बिबट्याबरोबर संघर्ष उद्भवणार नाही. तसेच उदमांजर हा दुर्मिळ प्राणी असून तो वेगवेगळ्या रंगामद्ये आढळतो. अंगावर काळे पट्टे असणारे उदमांजर हे काहीअंशी बिबट्याच्या पिलासारखे दिसत असले तरी त्याचे तोंड, मान व डोक्याचा आकार लांबट असतो व त्याच्या शरीराइतकीच त्याची शेपटी सुद्धा लांब असते. हा प्राणी फळे, मांस व किडे खातो. दिवसा हा प्राणी झाडाच्या फांदीवर किंवा ढोलीत झोपतो. रात्री भक्ष्याच्या शोधात बाहेर पडतो. याच्यापासून देखील माणसाला कोणत्याही प्रकारचा धोका नाही. बिबट्या, उदमांजर हे ‘अन्न साखळी’चे महत्त्वाचे घटक असून, त्याचे संवर्धन व संरक्षण सर्वांचीच जबाबदारी असल्याचे वन विभागाचे मत आहे.
येथे सापडलेल्या उदमांजरास त्याच्या खाद्यातून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात असून त्याच्यावर पशुवैद्य दत्तात्रय रोकडे यांचेकडून प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी प्राणीमित्र गणेश निकम यांनी वनकर्मचारी अंकुश खोत, वनरक्षक दिपाली सांगावकर, वनपाल सुरेश चरापले यांच्या करवी वनविभागाच्या ताब्यात दिले आले.