वृत्तसंस्था / कोलंबो :
भारतात 2011 मध्ये झालेली आयसीसी वनडे विश्वचषक स्पर्धेची फायनल फिक्स होती आणि लंकन संघाने तो सामना भारताला ‘विकला’ होता’, असा खळबळजनक दावा तत्कालीन लंकन क्रीडामंत्री महिंदानंदा अलुथगमगेने केला. या दाव्यामुळे लंकन खेळाडू कमालीचे संतापले असून माजी कर्णधार कुमार संगकारा व महेला जयवर्धने यांनी हा आरोप स्पष्टपणे फेटाळून लावला. शिवाय, महिंदानंदा यांनी या दाव्याला आधार म्हणून पुरावे द्यावेत, अशी मागणीही केली.
लंकेतील स्थानिक टीव्ही वाहिनी ‘सिरसा’शी बोलताना महिंदानंदा यांनी हा दावा केला. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या 2011 आयसीसी विश्वचषक स्पर्धेच्या फायनलमध्ये 275 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना भारताने गौतम गंभीर (97) व तत्कालीन कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या (91) झंझावाती खेळाच्या बळावर विजयश्री खेचून आणली व झळाळत्या विश्वचषकावर दुसऱयांदा आपले नाव कोरले होते.
‘2011 ची वर्ल्डकप फायनल फिक्स होती. मी क्रीडामंत्री असताना देखील हेच बोललो होतो’, असा दावा महिंदानंदाने केला. ‘देशाचे हित पाहता मला ही बाब उघड करायची नव्हती. मला नेमके वर्ष 2011 की 2012 आठवत नाही. पण, लंकन संघ त्या सामन्यात विजयाच्या मार्गावर होता’, असेही या माजी क्रीडामंत्र्याने नमूद केले. सध्या लंकेत 5 ऑगस्ट रोजी निवडणूक होणार असून तूर्तास काळजीवाहू सरकारात महिंदानंदा राज्य वीज मंडळ मंत्री म्हणून कार्यरत आहे.
‘तो सामना फिक्स होता, याबाबत माझ्या मनात संदेह नाही. मी त्यावर माझी बाजू स्पष्टपणे मांडू शकतो. सामना फिक्स करण्यात कोण पुढे होते, याची मला पूर्ण कल्पना होती’, असा दावा या माजी क्रीडामंत्र्याने केला.
पुराव्याची मागणी
त्या लढतीत खेळलेला तत्कालीन कर्णधार कुमार संगकाराने यावर पुरावे देण्याची आग्रही मागणी केली. ‘ज्यांना हा सामना फिक्स होता, असे वाटते, त्यांनी सर्वप्रथम आयसीसी, भ्रष्टाचार प्रतिबंधक समिती आणि सुरक्षा विभागाकडे पुरावे सादर करावेत, जेणेकरुन त्या पुराव्यानिशी तपास सुरु करता येईल’, असे ट्वीट संगकाराने केले. त्या अंतिम लढतीत शानदार शतक झळकावणाऱया महेला जयवर्धनेने निवडणूक समोर असल्याने हा त्यांचा फंडा असल्याचा आरोप केला. ‘निवडणूक उंबरठय़ावर येते, त्यावेळी अशी सर्कस नेहमी सुरु होते. जे आरोप करतात, त्यांच्याकडे पुरावे, नावे यापैकी काही आहे का?’, असा प्रश्न जयवर्धनेने उपस्थित केला.
2011 वर्ल्डकपची फायनल फिक्स होती, असा दावा महिंदानंदाने यापूर्वी देखील केला होता. महिंदानंदा व तत्कालीन लंकन अध्यक्ष महिंदा राजपक्षा हे ती लढत पाहण्यासाठी प्रत्यक्ष हजर होते. महिंदानंदा यांच्याप्रमाणे माजी विश्वचषक जेता कर्णधार अर्जुन रणतुंगाने देखील फायनलमधील फिक्ंिसगबाबत सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी यापूर्वी केली होती, त्याला आता उजाळा मिळाला आहे.