नुकतेच झालेले तौक्ते चक्रीवादळ साऱया कोकण किनारपट्टीला तडाखा देऊन गेले. हजारो घरांचे नुकसान तर झालेच पण झाडे, पशु-पक्षी आणि पर्यावरणाची हानी झाली, त्याची गणतीच नाही.
निसर्गात घडणाऱया अनेक गोष्टी मानवी नियंत्रणाच्या बाहेर आहेत. त्यापैकी चक्रीवादळ ही एक आपत्ती होय. चक्रीवादळसारखी संकटे उभी राहिल्यानंतर त्यापासून सुरक्षित बचाव करण्याचे मार्ग सामुहिक पातळीवर शोधले जातात. त्यामुळे अधिकाधिक लोकांना किमान नुकसान पोहोचते. नुकतेच झालेले तौक्ते चक्रीवादळ साऱया कोकण किनारपट्टीला तडाखा देऊन गेले. हजारो घरांचे नुकसान तर झालेच पण झाडे, पशु-पक्षी आणि पर्यावरणाची हानी झाली. त्याची गणतीच नाही.
शनिवारपासून सोमवारपर्यंत कमी अधिक प्रमाणात हे वादळ राज्याच्या वेगवेगळ्या भागातून गुजरातच्या दिशेने पुढे सरकत होते. वादळाने कोकणात कोणत्याही ठिकाणी प्रत्यक्ष धडक दिली नसली तरी समुद्रातून जाताना शेजारच्या प्रदेशाला जोराचा तडाखा बसला. आधुनिक तंत्रज्ञानामुळे वादळाचे पूर्वानुमान काढणे शक्य होत आहे. शासकीय आणि प्रशासकीय पातळीवर नैसर्गिक आपत्तीची दखल घेण्याची प्रवृत्ती वाढली आहे. यामुळे लोकांना सजगतेचा इशारा देऊन प्रसंगी सुरक्षित स्थळी हलवण्याच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. दोन दिवसापूर्वी झालेल्या चक्रीवादळात सर्वांनीच आपत्तीचा इशारा गांभिर्याने घेतल्याचे दिसून आले. प्रत्येकाने आपापल्या पातळीवर बैठका घेऊन कार्यवाहीची रणनीती तयार केली. यामुळे धोकादायक व कच्च्या घरातून लोकांना हलवण्याच्या सूचना काही ठिकाणी देण्यात आल्या तर काही ठिकाणी वादळानंतर संभाव्य अडचणी दूर करण्याची योजना अगोदरच आखता आली. कोकणातील समुद्रकिनारी बंदरांमध्ये मच्छिमार नौका वादळाच्या पूर्वी उभ्या करून ठेवण्यात आल्या. महाराष्ट्राबाहेरील अनेक नौका या काळात कोकणात मच्छिमारी करत होत्या. या नौकांना इशारा मिळताच त्या नजीकच्या बंदरात सुरक्षिततेसाठी जाऊन उभ्या राहिल्या. रत्नागिरी जिह्यात जयगड येथे एक नौका नांगरलेली असताना बुडाली. देवगड बंदरात 5 मोठय़ा नौकांसह 50 होडय़ा वाहून गेल्या. यापैकी 3 बोटी खडकावर फेकल्या गेल्या. दोन बोटींना जलसमाधी मिळाल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. एका खलाशाचा मृतदेह नजीकच्या खाडीपात्रात सापडला. तीन खलाशांचा शोध सुरू आहे. खेड तालुक्यात बोरज येथे विद्युतभारीत तार तुटल्याने अपघात झाला. या तारेचा स्पर्श होऊन पती-पत्नीचा मृत्यू झाला. यानंतर बचाव कार्य हाती घेण्यात आले. तथापि त्या दोघांचा जीव वाचू शकला नाही. नौकेतील खलाशी असो अथवा रस्त्यावरून जाणारे प्रवासी असोत अथवा दुचाकीवरून घरी परतणारे दाम्पत्य असो त्यांना परिस्थिती किती जोखमीची आहे याचा अंदाज घेता आला नाही.
रत्नागिरी जिह्यात 1 हजार घरांना चक्रीवादळाचा तडाखा बसल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सिंधुदुर्ग जिह्यातही अशाच प्रमाणात घरांना, गोठय़ांना आणि मांगरांना तडाखा बसला आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिह्यात 5 लाखाहून अधिक वीजग्राहकांना वादळाचा फटका बसला आहे. गतवर्षी दापोली आणि मंडणगड तालुक्यांना निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसला होता. तेथील वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी तब्बल दोन महिने लागले होते. यावेळी यापेक्षा लवकर वीज पुरवठा सुरळीत होईल, अशी आशा महावितरणचे अधिकारी बाळगून आहेत. यापूर्वीच्या नैसर्गिक आपत्तीपेक्षा आताच्या आपत्तीमध्ये प्राधान्यक्रम बदलले आहेत. वादळ संपल्यानंतर पहिल्यांदा रुग्णालयांना वीज पुरवठा करण्याचे ठरवण्यात आले आहे. ऑक्सिजन संयंत्रे, व्हेंटिलेटर्स यासारख्या अत्यावश्यक बाबींसाठी तातडीचा वीज पुरवठा हे काम सर्वोच्च प्राधान्याचे बनले आहे. पहिल्या 24 तासात कोकणातील सर्व कोव्हिड रुग्णालयांमध्ये वीज पुरवठा करण्याचे उद्दिष्ट असले तरी प्रत्यक्षात तसे होऊ शकले नाही. जनरेटरची सोय करावी लागली. आपत्ती नियंत्रणाचे आराखडे बनवण्यात आले असले तरी ते परिपूर्ण नाहीत हे आपत्तीने दाखवले गेले.
सिंधुदुर्ग जिह्यामध्ये बागायतीला वादळाचा मोठा फटका बसला. हापूस आंबा कलमे, नारळ, सुपारी, काजू, जांभूळ आदी फळ झाडांच्या पिकांचे प्राथमिक सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये 172 गावांमध्ये 3,375 हेक्टरवरील फळझाडे उद्ध्वस्त झाल्याचे दिसून आले. रत्नागिरी जिह्यातदेखील 5 हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रात फळझाडांचे नुकसान झाले असावे असा प्राथमिक अंदाज आहे. या चक्रीवादळात अनेक झाडे मोडून पडतात. त्याचबरोबर जाग्यावर उभी असलेली फळझाडे देखील आतून जबर जखमी झालेली असतात. यातील काही फळझाडे वादळानंतरच्या कालावधीत म्हणजे पुढच्या महिनाभरात हळूहळू मरणपंथाला लागतात असा शेतकऱयांचा अनुभव आहे. नारळासारखी झाडे चक्रीवादळाने आतून जखमी झालेली असल्याने त्यांचा धर कमी येतो. पुढील काही वर्षे वादळाचा दुष्परिणाम या झाडांना जाणवत राहतो असे फळबाग शास्त्रज्ञ सांगत आहेत. यामुळे शेतकऱयांना केवळ उद्ध्वस्त झालेल्या झाडांची भरपाई देण्याऐवजी व्यापक विचार करून भरपाई रक्कम ठरवावी अशी मागणी होत आहे.
विरोधी पक्ष सरकारवर अनेकवेळा टीका करत असले तरी यावेळी राज्याच्या विरोधी पक्षाने सरकारला सुचवले आहे की, झाडांच्या पुनर्लागवडीसाठी शास्त्रज्ञांनी सुचवलेल्या कार्यपद्धतीचा वापर सरकारी पातळीवर व्हावा. रचनात्मक कामांसाठी विरोधी पक्षाने हात पुढे केल्याची अपवादाने का होईना पण उदाहरणे यानिमित्ताने पुढे आली आहेत.
नैसर्गिक आपत्तीनंतर लोकांची बाधित झालेली घरे दुरुस्त करण्यावर भर होता. वादळ निवारल्यानंतर अनेक लोक घराबाहेर पडले ते घर दुरुस्तीचे सामान आणण्यासाठी. त्याचवेळी टाळेबंदी असल्याने घर सामानाची दुकाने बंद होती. वादळानंतर ही दुकाने उघडण्याची परवानगी न मागताच मिळणे अपेक्षित होते. परंतु त्यासाठी व्यापारी आणि ग्राहकांना आवाज द्यावा लागला. सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांना रत्नागिरीच्या व्यापाऱयांनी बोलावून परिस्थिती समजावून सांगितली आणि घर दुरुस्तीच्या सामानाची दुकाने उघडण्याची परवानगी मिळाली. आपत्ती नियंत्रणासाठी साधनसामुग्रीचा तपशीलवार विचार करणे नियामक प्रशासकीय व्यवस्थेला आवश्यक आहे हे अधोरेखित झाले.
सुकांत चक्रदेव