ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वादग्रस्त ठरलेले तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली. त्यांच्या निर्णयाचे संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने आम्ही स्वागत करतो. मात्र, संसदेत हे कायदे रद्द होण्याची वाट पाहिली जाईल, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार आहे. शेतकऱ्यांचे आंदोलन केवळ तीन काळे कायदे रद्द करण्याच्या विरोधात नाही तर शेतमालाला हमीभाव मिळण्यासाठीही आहे. शेतकऱ्यांची ही महत्त्वाची मागणी अजून बाकी आहे. लवकरच यासंदर्भात बैठक होईल आणि आंदोलन मागे घेण्यासंदर्भात निर्णय जाहीर केला जाईल, असे संयुक्त किसान मोर्चाचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाला संबोधित केले. यावेळी त्यांनी तीन कृषी कायदा विधेयके मागे घेण्याची घोषणा केली. परंतु एमएसपी आणि वीज दुरुस्तीबाबत समिती स्थापन करण्यासह अन्य मुद्यांवर अद्याप चर्चा झालेली नाही.
सध्या संयुक्त आघाडी लवकरच पुढील रणनीती आखणार आहे. हे आंदोलन तातडीने मागे घेतले जाणार नाही, असे राकेश टिकैत यांनी म्हटले आहे.