निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सज्ज रहा : जिल्हाधिकाऱयांनी केल्या सूचना : जबाबदारीकडे दुर्लक्ष झाल्यास कायदेशीर कारवाई
प्रतिनिधी / बेळगाव
महापालिका निवडणूक जाहीर झाल्याने प्रशासनाचा गोंधळ उडाला आहे. त्यामुळे तयारीसाठी बैठकांचा धडाका सुरू आहे. निवडणूक कालावधीत मनपाच्या कोणत्याच कर्मचाऱयाला रजा मिळणार नाही, आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडा, आचारसंहितेचे पालन काटेकोर करा, आदी सूचना गुरुवारी दुपारी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी बैठकीत केल्या.
मनपा निवडणुकीची घोषणा झाल्याने तयारी करण्यात मनपा प्रशासन व्यग्र झाले आहे. सकाळी अधिकारी व कर्मचाऱयांची बैठक घेऊन कामाची जबाबदारी सोपविण्यात आली. दुपारी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी मनपाच्या विभाग प्रमुखांची बैठक घेऊन विविध सूचना केल्या. विशेषतः निवडणूक आचारसंहितेचे पालन करणे बंधनकारक असून, आचारसंहिता कालावधीत नवीन विकासकामे सुरू करू नयेत. आचारसंहिता नियमांचे उल्लंघन झाल्यास तातडीने निवडणूक अधिकाऱयांच्या निदर्शनास आणून द्यावे. निवडणूक कालावधीत अधिकारी व कर्मचाऱयांनी आपल्या जबाबदाऱया व्यवस्थित पार पाडाव्यात. निवडणूक कालावधीत कोणत्याही कर्मचाऱयाला रजेवर जाता येणार नाही, अशा सूचना जिल्हाधिकाऱयांनी केल्या. निवडणूक कालावधीत जबाबदारीकडे दुर्लक्ष करणाऱया कर्मचाऱयाला कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा यावेळी दिला. बैठकीवेळी अप्पर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी यांनी आचारसंहितेची माहिती देऊन निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सज्ज राहण्याची सूचना मनपा कर्मचाऱयांना केली. यावेळी प्रभारी सामान्य प्रशासन उपायुक्त अधीक्षक अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर, महसूल उपायुक्त एस. बी. दोड्डगौडर आदींसह कौन्सिल विभागाचे अधिकारी व विभाग प्रमुख उपस्थित होते.