प्रतिनिधी / शिराळा
शिराळा येथील ऐतिहासिक तोरणा भुईकोट किल्ला व चांदोली परिसर पर्यटन विकासाच्या दृष्टीने राज्याचे पर्यटन मंत्री मा. ना. अदित्य ठाकरे यांची भेटी घेतली. त्यावर मंत्री ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे, अशी माहिती आमदार मानसिंगराव नाईक यांनी दिली. सोबत खासदार धैर्यशील माने होते, असेही ते म्हणाले.
या दोन्ही ठिकाणांबाबत मंत्री महोदयांना माहिती देताना म्हणाले, की शिराळा येथील तोरणा भुईकोट किल्ल्याला ऐतिहासिक अनन्यसाधारण महत्व आहे. परंतू ही माहिती व महत्व लपून राहीले आहे. मुकर्रब खानाने छत्रपती संभाजी महाराजांना संमेश्वरला कैद केली. तेथून मलकापूर मार्गे महाराजांना घेवून ते शिराळ्याच्या तोरणा भूईकोट किल्ल्यावर मुक्कामास येत होते. यावेळी मराठ्यांच्या राजाला सोडवायचे, अशी तयारी तोरणा किल्याचे तत्कालीन किल्लेदार उदाजी चव्हाण व त्यांच्या सहकार्यांनी केली. मदतीसाठी त्यांनी परिसरातील नागरीक व पन्हाळ्याचे जोत्याजी केसरकर यांना पाचारण केले.
मराठयांच्या ह्या नियोजनाची बातमी मुकर्रब खानाला समजली. त्यांने अचानक हल्ला करून मराठ्यांची ही योजना हाणून पडली. आणि मराठ्यांच्या राजाला इतिहासात सोडविण्याचा एकमेव प्रयत्न फसला. हा येथील तोरणा किल्ल्याचा इतिहास आहे. इतिहासातील ही एकमेव घटना आहे. येथून पन्हाळगडापर्यंत जाण्याचा भूयारी मार्गही आहे. त्याचा साक्षीदार असलेला तोरण किल्ला व परिसराचे सवंर्धन व पर्यटनाच्या दृष्टीने राज्य शासनामार्फत विकासा व्हावा, अशी अग्रहाची मागणी मी केली आहे.
ते म्हणाले, शिराळा तालुक्यातील चांदोली हे 34 टीएमसी क्षमतेचं अशिया खंडातील क्रमांक दोनचे मातीचे धरण आहे. चांदोली राष्ट्रीय उद्यान व होऊ घातलेला व्याघ्र प्रकल्प, विज प्रकल्प, निमसदाहरीत अभयारण्य तसेच जवळच असलेले गुढे – पाचगणी थंड हवेचे ठिकाण या परिसराचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास करणे महत्वाचे आहे. त्यामुळे राज्य सरकारला महसूल मिळणार आहे. या परिसरात पर्यटन विकास झाल्यास मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल. या परिसरातून कामासाठी, व्यवसायासाठी, नोकरीसाठी, माथाडी कामगार म्हणून मुंबईकडे जाणारा युवकांचे लोंढे थांबतील व त्याला रोजगार अथवा व्यवसाय करण्याची संधी येथेच उपलब्ध होईल.
जिल्ह्यातील किंबहूना राज्यातील एक प्रसिध्द पर्यटन क्षेत्र म्हणून शिराळा तालुका किंबहूना सांगली जिल्हा नावारूपला येईल. याबाबत राज्याचे जलसंपदा मंत्री मा. ना. जयंतराव पाटील यांनी चांदोली येथे जिल्हाधिकार्यांसोबत भेट देवून प्रत्यक्ष पहाणी केली आहे. तसेच इको फ्रेंडली पध्दतीने चांदोली धरण परिसराचा पर्यटन विकास करण्याच्या दृष्टीने मंत्रालयात महत्वपूर्ण प्राथमिक बैठक घेतल्याची चर्चेवेळी मंत्री महोदय मा. ना. ठाकरे यांना माहिती दिली. त्यांनी लवकरच याबाबत निर्णय घेवून कार्यवाही करण्याचे अभिवचन दिले आहे.