महामार्गावर आयशर कॅन्टरची दुचाकीला धडक
प्रतिनिधी / बांदा:
मुंबई-गोवा महामार्गावर तोरसे बीएड कॉलेजनजीक सुप्रिया बार समोरील धोकादायक वळणावर आयशर कॅन्टरने चुकीच्या लेनने येत दुचाकीला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार गाडीपासून सुमारे 20 फूट फेकला जात रस्त्यावर आदळल्याने मोठय़ा प्रमाणात दुखापत होऊन रक्तस्त्राव झाल्याने जागीच ठार झाला. योगेश रामचंद्र परब (26, कालेली, ता. कुडाळ) असे त्या युवकांचे नाव आहे. हा अपघात गुरुवारी सकाळी पावणे आठ वाजण्याच्या सुमारास झाला. सिंधुदुर्गमध्ये रोजगाराची संधी नसल्याने युवकांना गोवा गाठावे लागत आहे. गेल्या दोन महिन्यात हा दुसरा बळी आहे.
याबाबत पेडणे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कालेली (ता. कुडाळ), येथील युवक आपल्या ताब्यातील दुचाकी (जीए-07 डी 7070) घेऊन पेडणेच्या दिशेने जात होता. तो तोरसे येथील सुप्रिया बार व रेस्टॉरंटसमोर आला असता पेडणेहून पत्रादेवीच्या दिशेने चुकीच्या लेनने भरधाव येणाऱया (जीए-06-टी-7700) या कॅन्टरने जोरदार धडक दिली. ही धडक एवढी मोठी होती की, या धडकेत दुचाकीस्वार योगेश 20 फूटाहून अधिक फेकला जाऊन रस्त्यावर आदळला. तर यात त्याची बॅग सुद्धा एका बाजूला जाऊन पडली. त्यावरून अपघाताची भीषणता लक्षात येते. यात त्याला गंभीर दुखापत होऊन रक्तस्त्राव झाल्याने तो जागीच ठार झाला. यात दुचाकीचे सुद्धा नुकसान झाले. तो गोव्यात कामानिमित्त जात असताना त्याच्यावर वाटेतच काळाने घाला घातला. अपघाताचे वृत्त समजताच घटनास्थळी स्थानिक ग्रामस्थांसाह पेडणे (गोवा) पोलीस निरीक्षक जिवबा दळवी व सहकाऱयांनी घटनास्थळी धाव घेतली. सिंधुदुर्गमधून योगेशचे मित्र सुद्धा गोव्यात दाखल झाले. अपघाताची नोंद पेडणे पोलिसात करण्यात आली. याबाबतचा अधिक तपास पेडणे पोलीस करीत आहेत.
बुधवारीच योगेश परब आपल्या कालेली येथील घरी आला होता. मित्राकडे कार्यक्रम असल्यामुळे बुधवारी सायंकाळी आला होता. सकाळी तो पुन्हा गोव्यात जायला निघाला. मात्र, त्याच्यावर काळाने घाला घातला. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे. वडील माजी सैनिक आहेत.
रोजगारासाठी जाताना दोन महिन्यात दुसरा बळी
सिंधुदुर्गमध्ये रोजगाराची संधी नसल्याने हजारोंच्या संख्येने तरुण नोकरीसाठी गोव्यात ये-जा करतात. अलीकडेच 23 जुलै रोजी वेंगुर्ले मठ येथील गीतेश गावडे या युवकाचा गाळेल येथे दरडी खाली सापडून मृत्यू झाला होता. गुरुवारी अपघातात आणखी एका युवकाचा मृत्यू झाला. त्यातच पत्रादेवी ते म्हापसापर्यंत रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे ठिकठिकाणी एकदिशा मार्ग सुरू आहे. याचा चालकाला अंदाज येत नसल्याने अपघाताचे सत्र वाढत आहे. leteDuration