अन्यथा रस्तारोको आंदोलन छेडणार; सरपंच प्रार्थना मोटे यांचा इशारा
प्रतिनिधी /पेडणे
राष्ट्रीय महामार्ग बांधकाम करणाऱया कंपनीच्या हलगर्जीपणामुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर अनेक अपघात झाले असून या अपघातात अनेकांचे बळी गेले आहेत. तोरसे येथे मंगळवारी झालेल्या कार व कंटेनर अपघातात आई व मुलांचा जागीच मृत्यू झाला. असे अपघात यापुढे होऊ नयेत यासाठी येथील रस्ता त्वरित दुरूस्त करावा, अन्यथा रस्तारोको आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा तोरसे सरपंच प्रार्थना मोटे यांनी अपघात स्थळी †िदला.
यावेळी माजी जिल्हा पंचायत सदस्य सूर्यकांत तोरस्कर, उपसरपंच उत्तम वीर, सामाजिक कार्यकर्ते उमेश तळवणेकर, उमेश गाड उपस्थित होते.
पेडणे तालुक्मयात राष्ट्रीय महामार्ग 66 हा अनेक ठिकाणी धोकादायक स्थितीत आहे. ठिकठिकाणी अर्धवट स्थितीत रस्ते, धोकादायक वळणांवर रस्त्यांना खड्डे, संरक्षण भिंती नसलेला परिसर आहे. सदर बांधकाम कंपनीने हा रस्ता वाहतुकीस लवकरात लवकर सुरळीत करावा, अशी मागणी माजी जिल्हा पंचायत सदस्य सूर्यकांत तोरस्कर यांनी केली.
तोरसे येथे धोकादायक स्थितीत रस्ता आहे. त्या ठिकाणी अनेक अपघात झाले आहेत. या रस्त्याचे काम अर्धवट स्थितीत ठेवलेल्या कंत्राट दारावर सरकारने कारवाई करण्याची गरज आहे, असे तोरस्कर म्हणाले.
अर्धवट स्थितीत असलेल्या रस्त्यामुळे अपघात घडून अनेकांचे बळी जात आहेत. आणखी सरकारला किती बळी हवेत ? असा सवाल करून सरकारने सदर रस्ता बांधकाम कंत्राटदारावर कारवाई करावी. तसेच सदर कंत्राटदाराला ब्लॅकलिस्ट मध्ये टाकावे, अशी मागणी बहुजन समाजाचे नेते उमेश तळवणेकर यांनी केली.
राष्ट्रीय महामार्ग बांधकाम कंत्राटदार सरकारला जुमानत नाही. तोरसे येथे वरचेवर अपघात होतात मात्र कंत्राटदाराला त्याचे काही पडले नाही. योग्य नियोजन नसल्यामुळे अपघात होत आहेत. महामार्ग बांधकाम कंपनीने आतापर्यंत अनेकांचे बळी घेतले आहेत. सरकारी अधिकारी सुस्त असून यापुढे अशा घटना घडणार नाहीत यांची सराकारने दक्षता घ्यावी, अशी मागणी उमेश गाड यांनी केली.