पंतप्रधान मोदींचे विधान : हुतात्म्यांना नमन : संसदेवरील दहशतवादी हल्ल्याला 19 वर्षे पूर्ण
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासह अनेक मंत्री तसेच विरोधी पक्षाच्या नेत्यांनी संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात हौतात्म्य पत्करलेल्या जवानांना नमन केले आहे. संसद भवन परिसरात झालेल्या कार्यक्रमात या सर्व मान्यवरांनी हुतात्म्यांना आदरांजली वाहिली आहे. संसदेवरील हल्ला आणि त्याचे रक्षण करताना हौतात्म्य पत्करलेल्या जवानांना भारत कधीच विसरणार नसल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
राज्यसभा उपसभापती हरिवंश, संरक्षणमंत्री राजनाथ सिंग, गृहमंत्री अमित शाह, काँग्रेसचे राज्यसभा खासदार गुलाम नबी आझाद, राजीव शुक्ला आणि समाजवादी पक्षाचे खासदार रामगोपाल यादव यावेळी उपस्थित होते.
2001 मध्ये संसदेचे रक्षण करताना सर्वोच्च बलिदान करणाऱया शूरवीरांना देश कायमच स्मरणात ठेवणार आहे. दहशतवादी शक्तींना पराभूत करण्याचा संकल्प अधिक दृढ करावा लागणार असल्याचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटले आहे.
संसदेवर झालेल्या भ्याड हल्ल्याला भारत कधीच विसरणार नाही. आमच्या संसदेचे रक्षण करताना हुतात्मा होणाऱया शूर जवानांचे आम्ही स्मरण करतो. भारत नेहमीच या सर्वांचा ऋणी राहणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवर नमूद केले आहे.
19 वर्षांपूर्वी दहशतवादी हल्ला
19 वर्षांपूर्वी 13 डिसेंबर रोजी लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी संसद परिसरावर हल्ला केला होता. या हल्ल्यात दिल्ली पोलिसांचे 5 जवान, सीआरपीएफच्या एका महिला जवानाने हौतात्म्य पत्करले होते. तर राज्यसभेचे 2 कर्मचारी तसेच एका माळय़ाला या हल्ल्यात जीव गमवावा लागला होता. एका छायाचित्रकाराचाही मृत्यू झाला होता. प्रत्युत्तरादाखलच्या कारवाईत सुरक्षा दलांनी सर्व 5 दहशतवाद्यांना यमसदनी पाठविले होते.