पर्यायी सलामीवीर पाठवण्यास चेतन शर्मा प्रतिकूल
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
इंग्लंडमध्ये दुखापतग्रस्त शुभमन गिलऐवजी पर्यायी सलामीवीर न पाठवण्याचा निर्णय निवड समितीच्या अखत्यारीतील आहे, असे सांगत बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. भारतीय संघव्यवस्थापनाने यापूर्वी दि. 28 जून रोजी प्रशासकीय व्यवस्थापक गिरीश डोंगरे यांच्यामार्फत पृथ्वी शॉ व देवदत्त पडिक्कल यांना पर्यायी सलामीवीर म्हणून पाठवून देण्याची विनंती केली होती. पण, निवड समिती अध्यक्ष चेतन शर्मा यांनी सध्या चौघे सलामीवीर इंग्लंडमध्ये असल्याने या विनंतीला उत्तर दिले नव्हते.
पृथ्वी शॉ व देवदत्त पडिक्कल हे दोन्ही सलामीवीर सध्या शिखर धवनच्या नेतृत्वाखालील भारतीय संघासमवेत लंका दौऱयावर असून तेथे भारत-लंका यांच्यात 3 वनडे व 3 टी-20 सामने होणार आहेत.
याशिवाय, नियमित कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध 4 ऑगस्टपासून 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दुसऱया आवृत्तीतील ही पहिली मालिका असणार आहे.
‘पृथ्वी शॉ लंकेमध्येच थांबेल आणि दि. 26 जुलैपर्यंत चालणाऱया मालिकेत तो पूर्ण सहभागी असेल. लंकेविरुद्ध मालिका झाल्यानंतर आवश्यकतेनुसार, त्याला इंग्लंडविरुद्ध मालिकेत पाठवण्याचा विचार होऊ शकेल. पण, तूर्तास अशी कोणतीही शक्यता नाही’, असे मंडळातील एका सूत्राने यापूर्वी गोपनियतेच्या अटीवर सांगितले होते.
का हवेत पर्यायी सलामीवीर?
इंग्लंडमध्ये सराव सत्रादरम्यान राखीव सलामीवीर अभिमन्यू ईश्वरनमध्ये आत्मविश्वास दिसत नसल्याने संघव्यवस्थापनाने पर्यायी सलामीवीरांची मागणी केली असल्याचे वृत्त आहे. अभिमन्यू ईश्वरन अगदी थ्रो डाऊन स्पेशालिस्ट रघूच्या थ्रोला सामोरे जाताना देखील चाचपडत होता, अशीही चर्चा आहे.