सागरतटावरील घरांची हानी, जीवीत हानी नियंत्रणात
गांधीनगर / वृत्तसंस्था
आधी व्यक्त झालेल्या अनुमानानुसार मंगळवारी मध्यरात्रीनंतर तौक्ते या वादळाने गुजरात सागरतटाला धडक दिली आहे. मात्र, तोपर्यंत त्याची तीव्रता बरीच कमी झाली होती. या वादळामध्ये सौराष्ट्र भागांमध्ये 3 व्यक्तींचा मृत्यू झाला असून 50 हून अधिक जखमी झाले. साधारणतः 1 हजार 600 घरांची कमी-अधिक प्रमाणात हानी झाली असून आता वादळ शमण्याच्या बेतात आहे.
या वादळाने सौराष्ट्रच्या गीर सोमनाथ जिल्हय़ातील उना येथे सागरतट ओलांडून भूमीवर धडक दिली. यावेळी साधारणतः 150 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहत होते. सोसाटय़ाचा वारा आणि प्रचंड पाऊस यामुळे या जिल्हय़ातील 2 हजार 500 गावांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला. तसेच शेकडो घरांची पडझड झाली.
आपत्तीनिवारणाची सज्जता
वादळाची दिशा लक्षात घेऊन सौराष्ट्रात आधीच सज्जता ठेवण्यात आली होती. परिणामी जीवीत व वित्तहानी मर्यादेत राहिली. दोन लाख लोकांना संभाव्य प्रभाव क्षेत्रांमधून सुरक्षित स्थळी हालविण्यात आले होते. तसेच आपत्तीनिवारण दलांना सज्ज राहण्याचा आदेश देण्यात आला होता. केंद्रानेही केंद्रीय आपत्तीनिवारण दले सज्ज ठेवली होती. अन्नसाठा, औषधे आणि कपडे इत्यादी जीवनावश्यक वस्तूंची जुळणी आधीच करून ठेवण्यात आली होती. ही सज्जता उपयोगी पडली.
खांब उन्मळले, रस्त्यांची हानी
वळसद आणि गीर सोमनाथ जिल्हय़ांमध्ये वीजेचे 181 खांब उन्मळून पडल्याची तसेच 196 रस्त्यांची हानी झाल्याची माहिती मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी दिली. अनेक रस्ते उखणल्याने बंद करण्यात आले आहेत. मात्र 42 मार्गांची तातडीने दुरुस्ती करण्यात यश आल्याने वाहतूक सुरळीत झाली आहे. अहमदाबाद व काही जिल्हय़ांमध्ये वृक्ष कोसळण्याच्या घटना घडल्याने पळापळ झाली होती.
रुग्णालये सुरक्षित
वादळ प्रभावित भागांमध्ये कोरोनावर उपचार करणारी 1 हजार 400 हून अधिक केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. त्यांना वादळपासून सर्वात जास्त धोका होता. तथापि. यांपैकी केवळ 16 केंद्रांची अंशतः हानी झाली आहे. सर्व केंद्रांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. प्रभावित केंद्रांमधून तेथील रुग्ण इतरत्र नेण्यात आले आहेत. एकाही रुग्णाची जीवीत हानी झालेली नाही, अशीही माहिती स्थानिक अधिकाऱयांनी दिली असून आपत्तीनिवारण कार्य सुरू आहे.
लसीकरण लांबणीवर
वादळाची शक्यता पाहता संभाव्य प्रभावित भागांमधील लसीकरण लांबणीवर टाकण्याची घोषणा शनिवारीच करण्यात आली होती. वादळ ओसरताच तेथे पुन्हा लसीकरणाचा प्रारंभ करण्यात येईल. रस्त्यांच्या डागडुजीला आतापासूनच प्रारंभ करण्यात आला असून येत्या दोन आठवडय़ांमध्ये स्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती रुपानी यांनी दिली.
जलवृष्टीचा प्रकोप
वादळामुळे सौराष्ट्र भागात मोठय़ा प्रमाणावर पर्जन्यवृष्टी झाली. अमरेली जिल्हय़ात आणि गीर सोमनाथ जिल्हय़ाच्या दोन तालुक्यांमध्ये अतिवृष्टी अद्यापही होत आहे. तथापि, या पावसाने फारशी हानी अद्यापपावेतो झालेली नाही. प्रशासनाचे परिस्थितीवर बारकाईने लक्ष असल्याचे स्पष्ट करण्यात आले. नावली नदीत एक कार वाहून गेल्याने एक व्यक्ती बेपत्ता असल्याचे सांगण्यात आले.
मच्छीमार बेपत्ता
वेरावळ जिल्हय़ात एक नाव समुद्रात बुडाल्यामुळे 10 मच्छीमार बेपत्ता झाले असल्याचे समजते. मच्छीमारांना वाचविण्यासाठी भारतीय नौदल व तटरक्षक दलाचे सहाय्य घेण्यात येत आहे. तथापि, एकंदर परिस्थिती नियंत्रणात असल्याचे दिसून येते असे प्रशासकीय अधिकाऱयांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.