मुंबई \ ऑनलाईन टीम
तौक्ते चक्रीवादळाचा फटका कोकण किनारपट्टीसह मुंबई शहर आणि उपनगरांमध्येही मोठ्या प्रमाणात बसल्याचं पाहायला मिळत आहे. अशावेळी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे हे मुंबई महापालिकेच्या कंट्रोल रुममध्ये दाखल झाले. तिथून त्यांनी मुंबईतील परिस्थितीचा आढावा घेतला व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना महत्वाच्या सूचनाही केल्या आहेत.
यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले की, वादळची दिशा गुजरातकडे आहे, वाऱ्याचा वेग प्रचंड आहे, सखल भागात पाणी साचलंय, जम्बो सेंटर्सच्या मेंटेन्सनची कामं सुरु आहेत, रात्रीपर्यंत ही परिस्थिती अशीच राहील, विनाकारण घराबाहेर पडू नका. तसंच 160 मिमी, 120 मिमी पाऊस वादळ आणि वाऱ्यासह होतोय. मनुष्यहानी होणार नाही, याची काळजी घेत आहोत. हायटाईड आहे, ती निघून जाईल. पण त्यानंतरही खबरदारी घ्यावी लागेल. कधीही न पाहिलेलं चक्रीवादळ मुंबई आता पाहत असल्याचंही आदित्य ठाकरे म्हणाले.
आदित्य ठाकरे यांनी यावेळी चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात झालेल्या चर्चेबद्दल माहिती त्यांनी दिली. केंद्र आणि राज्यात चर्चा होते, आवश्यक सूचना दिल्या जातात, एकमेकांशी समन्वय साधून, सर्वजण मिळून काम करत आहोत, असंही ते म्हणाले.