ऑनलाईन टीम / मुंबई :
कोरोना सारख्या भिषण आपत्तीसोबत लढणाऱ्या महावितरणला आता ‘तौत्के चक्रीवादळा’चा तडाखा बसला आहे. चक्रीवादळाने बारामती परिमंडलात महावितरणचे 48 उपकेंद्र बाधीत झाले असून, घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिकसह 3 लाख 42 हजार 385 ग्राहकांचा वीजपुरवठा विस्कळीत झाला होता. मात्र नैसर्गिक आपत्तीशीही दोन हात करणाऱ्या वीज कर्मचाऱ्यांनी काही तासांतच 44 उपकेंद्र व 3 लाख ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत केला आहे. तर कोवीड रुग्णालये, कोवीड केअर सेंटर्स, ऑक्सीजन निर्मिती केंद्रे यांच्या अखंडित वीजपुरवठ्यासाठी सर्व वीज यंत्रणा 24 तास कार्यरत आहे.
ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी चक्रीवादळाशी संबंधित परिमंडलांना या नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी पूर्व कल्पना देऊन विभागीय पातळीपर्यंत नियंत्रण कक्ष स्थापन करुन सर्व कक्ष मुख्यालयाच्या नियंत्रण कक्षाशी कायम संपर्कात राहून आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत.
पुणे, सोलापूर व सातारा जिल्ह्यात चक्रीवादळ येण्यापूर्वीच वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने वीज यंत्रणेला मोठा तडाखा दिला. बारामती परिमंडलात रविवारी दुपारपर्यंत मिळालेल्या महितीनुसार 547 विजेचे खांब कोसळले. तर 18773 रोहित्र बंद पडल्याने 869 गावांतील वीजपुरवठा विस्कळित झाला होता. मात्र वीज कर्मचाऱ्यांनी अविरत परिश्रम घेऊन 15319 रोहित्रांचा वीजपुरवठा पर्यायी मार्गाने पूर्ववत करुन बाधित पैकी 797 गावे सुरु झाली. तर उर्वरित गावामधीलही बहुतांश वीजपुरवठा पर्यायी मार्गाने सुरु करण्यात येत आहे.
वीजपुरवठा पूर्ववत करताना कोवीड हॉस्पीटल, कोवीड केअर सेंटर्स, ऑक्सीजन प्लान्ट, इतर सर्व रुग्णालये, लशीकरण केंद्रे, मोबाईल मनोरे, पाणी पुरवठा, रेल्वेसह सर्व अत्यावश्यक सेवा यांचा वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरण प्रयत्नशील असून, संचालक (संचलन) संजय ताकसांडे व प्रभारी प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांचे निर्देशानुसार मुख्य अभियंता सुनील पावडे यांनी सर्व संबंधित विभागांना वादळानंतर पर्यायी मार्गाने तातडीने वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी साहित्य व मनुष्यबळ सदैव तयार ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार सर्व वीजपुरवठा कमीत वेळेत सुरळीत करण्यासाठी महावितरण यंत्रणा काम करत आहे.