पालिकेतला कचरा बाहेर काढणार, आ. शिवेंद्रसिंहराजेंचा उदयनराजेंवर निशाणा,
प्रतिनिधी/ सातारा
शहराचा विकास होईल या अपेक्षेने सातारकरांनी एकहाती सत्ता दिली पण, सातारकारांचा मोठा अपेक्षाभंग झाला. सातारा पालिकेत कमिशन आणि टक्केवारीसाठी एकमेकांचे गळे धरण्याच्या ऐतिहासिक घटना सातारकरांना पाहाव्या लागल्या. गेल्या साडेचार, पावणेपाच वर्षात सत्ताधाऱयांनी पालिकेला फक्त लुटण्याचे काम केले. आता निवडणूक जवळ आल्याने विकासकामांचा पाऊस भासवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जात असून सत्ताधाऱयांनी अख्य्या टर्ममध्ये भ्रष्टाचाराचा सुकाळ केला. सत्ताधारी थापांचा पाऊस पाडण्यात माहीर असले तरी, हा तर केवळ निवडणुकीचा मोसमी पाऊस आहे, हे सातारकर ओळखून आहेत. त्यामुळे पालिकेतील ‘कचरा’ हळूहळू हद्दपार करण्याची वेळ जवळ आली आहे, असा उपरोधिक टोला आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी खासदार उदयनराजेंना लगावला.
गेल्या साडेचार- पावणेपाच वर्षात सातारा पालिकेत सत्ताधारी आघाडीतील नगरसेवकांमध्ये टेंडर, टक्केवारीसाठी लागणारी कळवंड सातारकर उघडय़ा डोळ्याने पाहत आले आहेत. सातारा विकास आघाडीत भ्रष्टाचारावरून सुरु असलेल्या कळवंडीवर पडदा टाकण्याचा केविलवाणा प्रयत्न नेत्यांना अनेकदा करावा लागला हि वस्तुस्थिती आहे. नेते भ्रष्टाचार खपवून घेत नाहीत असा नुसता ढोल बडवून अन् डांगोरा पिटून पालिकेतील भ्रष्ट कारभाराचे सत्य लपवण्याचा प्रयत्न अनेकदा झाला किंबहुना तसा प्रयत्न करण्याची दुर्दैवी वेळ अनेकदा आली. वास्तविक सातारा पालिकेला सत्ताधाऱयांनी भ्रष्टाचाराचे कुरन बनवले असून सत्ताधाऱयांवर कोणाचाही अंकुश राहिलेला नाही, हे सातारकरांना चांगलेच कळून चुकले आहे. आता परवाच निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेसंदर्भात सूचना काढल्याने सत्ताधायांनी विकासकामांचा पाऊस दाखवून नागरिकांना भुलवण्याचा उद्योग सुरु केला आहे. निवडणूक आयोगाने सूचना थोडी उशिरा काढली असती तर सातारकरांना हा थापेबाजी पाऊस आज दिसला नसता, हा कथित विकासकांचा पाऊसही लांबला असता.
सत्ताधारी नेत्यांनी पत्रकबाजी करून पाडलेला पाऊस हा निवडणुकीचा मोसम आल्यानेच पडला आहे, हे सातारकर जनता चांगलीच ओळखून आहे. अख्या टर्ममध्ये सत्ताधाऱयांनी कमिशन आणि टक्केवारीसाठी एकमेकांची गचुंडी धरली, घरकुल योजना, घनकचरा प्रकल्प, घंटागाडी अशा सर्वच कामांमध्ये भ्रष्टाचार झाला. कमिशन तुला मिळतंय का मला अशी अजब स्पर्धाच सत्ताधाऱयांनी पालिकेत सुरु केली. हद्दवाढ होऊन आता वर्षभराचा कालावधी लोटला पण, हद्दवाढीतील नवीन भागासाठी एकही काम सत्ताधाऱयांनी केले नाही. कोरोना महामारीचा विळखा बसला असताना साधं एक आयसोलेशन सेंटर सुरु केलं नाही आणि आता निवडणूक डोळ्यासमोर ठेवून निघाले विकासकामांचा पाऊस पाडायला. हे न समजण्याएवढी जनता काही दूधखुळी नाही, हे सत्ताधाऱयांनी ध्यानी ठेवले पाहिजे.